‘भुजबळांकडे पेढे खायला, प्रफुल्ल पटेलांकडे जेवायला जाणार’; उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
नागपूर : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पेन्शनच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर टीका केली आहे. प्रफुल्ल पटेलांनी इक्बाल मिर्चीशी व्यवहार केले त्याबद्दल भाजपा काहीच का बोलत नाही? असा सवाल उपस्थित केला. यानंतर त्यांनी प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ यांच्यावरही जोरदार हल्लाबोल केला.
उद्धव ठाकरे म्हणाले, आम्ही आता छगन भुजबळांकडे पेढे खायला जाणार आहोत. कारण त्यांची चौकशी बंद करण्यात आली. त्यांना काही वर्षे तुरुंगात ठेवल्यानंतर जेव्हा जामीन मिळाला तेव्हाही धमक्या दिल्या जात होत्या की जामिनावर आहात विसरु नका. आता नेमकं असं काय घडलं? की त्यांची चौकशी बंद झाली? छगन भुजबळ यांच्याकडे आम्ही आता पेढे खायला जाणार आहोत.
हेही वाचा – ‘अजित पवारांना भाजपा कधीही मुख्यमंत्री करणार नाही’; नेमकं असं कुणी म्हटलं?
छगन भुजबळांना कुठला साधूबाबा आणि जडीबुटी मिळाली की त्यांच्यावरची चौकशीच बंद करण्यात आली? ही जडीबुटी देवा सगळ्यांना दे अशी माझी प्रार्थना आहे. हे सरळ सरळ थोतांड आहे. ते म्हणजे हिंदुत्व नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
छगन भुजबळांकडे जाऊन पेढे खाल्ले की नंतर माझा विचार असा आहे की संसदेचं अधिवेशन संपलं की प्रफुल्ल पटेल यांच्याकडे मी जेवायला जाणार आहे. पण त्यांना विनंती करणार आहे की ‘मिरची कम’ जेवण द्या, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला.