दुःखद घटना! शिर्डी ते आळंदी पायी दिंडीत भरधाव कंटेनर घुसला, ४ वारकरी ठार
नगर : शिर्डीहून आळंदी येथे निघालेल्या दिंडीत भरधाव कंटेनर घुसून झालेल्या अपघातात चार वारकरी ठार तर दहा वारकरी जखमी झाले आहेत. आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महाराज यांचा ७२६ वा संजीवन समाधी सोहळा आणि कार्तिकी वारी सोहळा दिनांक ५ डिसेंबर ते १२ डिसेंबर दरम्यान पार पडणार आहे. ९ डिसेंबर कार्तिकी एकादशी तर ११ डिसेंबरला माऊलींचा समाधी सोहळा आहे.
ही दिंडी शिर्डीहून संगमनेर मार्ग नाशिक-पुणे महामार्गाने आळंदी येथे जात होती. त्यावेळी पठार भागातील १९ मैल (खंदरमाळवाडी) येथे पाठीमागून भरधाव येणारा कंटेनर अचानक दिंडीत घुसला. वारकऱ्यांना कंटेनरची जोराची धडक बसली, त्यानंतर दिंडीतील रथाला देखील हा ट्रक धडकला.
छोटेलाल आलगोपालराम पाल (रा. गोपालपूर, ता. गाझीपूर, जि. सुलतानपूर, उत्तर प्रदेश) असे कंटेनरचालकाचे नाव आहे. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ताराबाई गंगाधर गमे रा. को-हाळे, भाऊसाहेब नाथा जपे रा.कनकुरी, बबन पाटील रा.द्वारकानगर, शिर्डी, बाळासाहेब गवळी रा. कोपरगाव अशी मृतांची नावे आहेत जखमेवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे
शिर्डी पासून काही अंतरावर निमगाव येथे संत ज्ञानेश्वर महाराजांचे मंदिर आहे. दरवर्षी तेथून शिर्डी ते आळंदी पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन केले जाते. या सोहळ्यात परिसरातील भाविक सहभागी होत असतात भाविकांना झालेल्या अपघातामुळे हळहळ व्यक्त होत आहे.