‘जन्म औरंगाबादमध्ये झाला पण मृत्यू मात्र संभाजीनगरमध्ये होणार’; भाजपा आमदाराची टीका
काहीही झालं तरी २०२५-२६ मध्ये भारत हिंदूराष्ट्र होणार
औरंगाबाद शहराचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्यात आलं आहे. दरम्यान, आता केंद्र सरकारने अधिकृत मान्यता दिल्यानंतर खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात एमआयएमकडून आंदोलन करण्यात येत आहे. माझा जन्म औरंगाबाद मध्ये झाला आणि मी औरंगाबादमध्येच मरणार असं वक्तव्य इम्तियाज जलील यांनी केलं होतं. यावरून हिंदूत्ववादी चेहरा म्हणून ओळखले जाणारे भाजपा आमदार टी राजा सिंग यांनी जलील यांच्यावर निशाणा साधला आहे.
औरंगाबाद आणि उस्मानाबादचे नाव बदलल्यामुळे काही लोक तडपत आहेत. मात्र येत्या काळात अहमदनगरचे नाव देखील बदलले जाईल. अहिल्याबाई होळकर नाव नगरला दिले जाईल. तुमचा जन्म औरंगाबादमध्ये झाला पण मृत्यू मात्र संभाजीनगरमध्ये होणार, अशी टीका टी राजा यांनी केली आहे.
२०२५ मध्ये भारत हिंदूराष्ट्र होणार
कोणी काहीही केलं तरी आता हि नावे बदलली जाणार नाहीत. आज हिंदू जागृत झाला आहे. भारताला अखंड हिंदूराष्ट्र घोषित करण्याची मागणी केली जातेय. त्यामुळे काहीही झालं तरी २०२५-२६ मध्ये भारत हिंदूराष्ट्र होईल, असंही टी राजा सिंग म्हणाले.