वर्ल्ड कप संघातील खेळाडू शुबमन गिल आणि कॅप्टन रोहित यांच्यात वाद
शुबमनला मायदेशी पाठवण्यामागे गैरवर्तन कारणीभूत
![World Cup, players, Shubman Gill, captain, Rohit, controversy, home, misconduct,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/06/rohit-1-780x470.jpg)
मुंबई : रोहित शर्मा याच्या नेतृत्वात टीम इंडियाने आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत सलग 3 सामने जिंकून सुपर 8 मध्ये धडक दिली आहे. टीम इंडियाने आयर्लंड, पाकिस्तान आणि यूएसएस या तिन्ही संघांचा पराभव केला. त्यानंतर आता टीम इंडिया साखळी फेरीतील चौथा आणि शेवटचा सामना हा कॅनडा विरुद्ध फ्लोरिडा येथे खेळणार आहे. त्याआधी टीम इंडियाच्या गोटातून मोठी बातमी समोर आली आहे. टीम इंडियाच्या वर्ल्ड कप संघातील राखीव खेळाडू शुबमन गिल आणि कॅप्टन रोहित यांच्यात वाजल्याचं म्हटलं जात आहे.
कॅनडा विरुद्धच्या सामन्यानंतर शुबमन गिल आणि आवेश खान हे 2 राखीव खेळाडू मायदेशी परतणार असल्याचं वृत्त होतं. मात्र आता शुबमनचं मायदेशी परतण्यामागचं कारण दुसरंच काही असल्याची कुजबुज सुरु झाली आहे. साधारणपणे मुख्य संघांतील खेळाडूंना दुखापत झाल्यास त्यांच्या जागी राखीव खेळाडूंना संधी दिली जाते. सुदैवाने आतापर्यंत टीम इंडियाच्या मुख्य संघातील एकाही खेळाडूला दुखापत झालेली नाही. त्यामुळे शुबमन आणि आवेश माघारी परतणार असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र शुबमनने केलेल्या शिस्तभंगामुळे त्याला माघारी पाठवलं असल्याची चर्चा आहे.
शुबमनचं काय चुकलं?
शुबमनला मायदेशी पाठवण्यामागे त्याचं गैरवर्तन असल्याचं म्हटलं जात आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, शुबमनला शिस्तभंगामुळे त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. कारण शुबमनने टीम इंडियासोबत यूएसएमध्ये प्रवास केला नाही. इतकंच नाही, तर शुबमनने फावळ्या वेळेत आपल्या इतर उद्योगाकडे लक्ष दिल्याचा दावा केला जात आहे. मात्र ही चर्चाच आहे, याबाबत अद्याप अधिकृत माहिती नाही.
इतकंच नाही, तर शुबमन कॅप्टन रोहितशी वाकडं घेतल्याचं म्हटलं जात आहे. शुबमनने रोहितला इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लटफॉर्मवर अनफॉलो केल्याची चर्चा आहे. त्यामुळे एकूणच रोहित-शुबमन या दोघांमध्ये नक्कीच काही तर खटके उडाले आहेत, अशी चर्चा आहे. आता ही केवळ चर्चा आहे की आणखी काही, मात्र याचा परिणाम टीम इंडियाच्या वर्ल्ड कप मोहिमेवर होऊ नये, अशी अपेक्षा प्रत्येक भारतीय क्रिकेट चाहत्याची आहे.
टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल , अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
राखीव खेळाडू : शुबमन गिल, आवेश खान, खलील अहमद आणि रिंकू सिंह