T20 World Cup: आज भारत-पाकिस्तान थरार; विराटसेना विजयासाठी सज्ज
![T20 World Cup: India-Pakistan thrill today; Viratsena ready for victory](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/10/India-vs-Pakistan.jpg)
दुबई – भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांमधील जनता क्रिकेटसाठी अक्षरशः वेडी आहे. आज टी-20 विश्वचषकात भारताच्या प्रवासाची सुरुवात पाकिस्तान विरोधातील बहुप्रतीक्षित सामन्याने होणार आहे. त्यामुळे क्रिकेटप्रेमी हा सामना पाहण्यासाठी अतिशय उत्सुक आहेत. पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या या दोन देशांमध्ये होणाऱ्या सामन्यांचा उत्साह आणि रोमांच कायमच शिगेला पोहोचलेला असतो. क्रिकेटप्रेमींमध्ये हा सामना सर्वाधिक लोकप्रिय आहे.
टी-20 विश्वचषक स्पर्धेत पाकिस्ताविरोधात भारतीय संघाचं पारडं जड आहे. आतापर्यंत पाकिस्तानविरोधात भारतीय संघाचा एकदाही पराभव झालेला नाही. ही भारताची जमेची बाजू मानली जात आहे. मात्र तरीही आजदेखील विजयी होण्यासाठी भारतीय संघाला पूर्ण तनमन झोकून खेळावे लागणार आहे. आज बाबर आझमच्या संघाविरोधात विराट कोहलीचा संघ कसा सामना करतो, हे पाहणे पाहण औत्सुक्याचे ठरणार आहे.
सामन्यापूर्वी कर्णधार विराट कोहलीने म्हटले आहे की, ‘आम्ही विजयासाठी पूर्णपणे सकारात्मक आहोत. या सामन्याला आम्ही इतर सामन्यासारखंच पाहत आहोत. मला माहित आहे की, बाहेर या सामन्याची खूप चर्चा आहे पण आम्ही याबाबत जास्त विचार करत नाही. आमच्यासाठी हा सामना नेहमीसारखाच एक सामना आहे. ज्यात आम्ही नेहमीसारखं उत्तम खेळू. मैदानाबाहेर फार उत्साह, जोश असेल पण खेळाडू म्हणून आम्ही पूर्ण ताकतीने उतरू.’
दरम्यान, दुबईच्या दुबई इंटरनॅशल स्टेडियमवर रंगणारा भारत विरुद्ध पाकिस्तान थरार आपल्याला आज संध्याकाळी साडेसात वाजता पाहायला मिळणार आहे. त्यापूर्वी सायंकाळी ७ वाजता नाणेफेक होईल.