SA vs IND : भारताचा दुसरा डाव ३२७ धावांत आटोपला, एन्गिडीचे ६ बळी
![SA vs IND: India won the second innings by 327 runs with 6 wickets in hand](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/12/mumbaitak_2021-12_561e68c3-989d-406c-bf31-9739b15e0dae_Engidi.jpg)
दुसऱ्या दिवसाच्या खेळात पावसाने व्यत्यय आणल्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी सामन्यात भारतीय फलंदाजांची घसरगुंडी उडाली आहे. ३ बाद २७२ वरुन तिसऱ्या दिवसाच्या खेळात पहिल्याच सत्रामध्ये भारताचा डाव ३२७ धावांमध्ये आटोपला. लन्गिसानी एन्गिडीने ६ विकेट घेत भारताच्या डावाला खिंडार पाडत आफ्रिकेला दमदार पुनरागमन करुन दिलं.
तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीच्या सत्रात कगिसो रबाडाने शतकवीर लोकेश राहुलचा अडसर दूर केला. लेग साईडला जाणारा बॉल खेळण्याच्या प्रयत्नात राहुल क्विंटन डी-कॉककडे कॅच देऊन माघारी परतला. राहुलने १७ चौकार आणि एका षटकारासह १२३ धावांची खेळी केली. यानंतर भारतीय संघाला लागलेली गळती काहीकेल्या थांबली नाही. अजिंक्य रहाणेही एन्गिडीच्या बॉलिंगवर माघारी परतला, त्याचं अर्धशतक दोन धावांनी हुकलं.
यानंतर ऋषभ पंत, रविचंद्रन आश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी या मधल्या फळीला झटपट गुंडाळण्यात आफ्रिकेच्या गोलंदाजांना यश आलं. जसप्रीत बुमराह आणि सिराजने अखेरच्या विकेटसाठी फटकेबाजी करत भारताला आव्हानात्मक धावसंख्या गाठून दिली. आपला पहिलाच कसोटी सामना खेळणाऱ्या जेन्सनने बुमराहची विकेट घेत भारताचा डाव संपवला. आफ्रिकेकडून एन्गिडीने ६, रबाडाने ३ तर जेन्सनने एक विकेट घेतली.