SA vs IND : आफ्रिकेला विजयासाठी २४० धावांचं आव्हान, भारत सामन्यात वरचढ
![SA vs IND: 240-run challenge for Africa to win, India lead in match](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/01/Ajinkya___Pujara.jpg)
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जोहान्सबर्ग कसोटी सामन्यात भारताने तिसऱ्या दिवशी आपलं वर्चस्व निर्माण केलं आहे. दुसऱ्या डावात भारताने २६६ धावांपर्यंत मजल मारत आफ्रिकेला विजयासाठी २४० धावांचं आव्हान दिलं आहे. फलंदाजीसाठी खडतर असलेल्या जोहान्सबर्गच्या खेळपट्टीवर भारताकडून अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजाराने केलेली शतकी भागीदारी आणि त्यानंतर अखेरच्या फळीत हनुमा विहारी आणि शार्दुल ठाकूरने केलेली फटकेबाजी ही महत्वाची ठरली.
दुसऱ्या दिवसाअखेरीस भारताने २ विकेट गमावत ८५ धावांपर्यंत मजल मारली होती. चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांच्यावर तिसऱ्या दिवशी मोठी जबाबदारी होती. या दोन्ही अनुभवी खेळाडूंनी आपल्या जबाबदारीचं भान ठेवत उत्तम खेळी केली. दोघांनीही दुसऱ्या डावात आपली अर्धशतकं झळकावत शतकी भागीदारी करत भारताचा डाव सावरला. दोघांनीही तिसऱ्या विकेटसाठी १११ धावांची भागीदारी केली.
७८ बॉलमध्ये ८ फोर आणि १ सिक्स लगावत अजिंक्य रहाणे ५८ धावांवर रबाडाच्या बॉलिंगवर माघारी परतला. कालांतराने चेतेश्वर पुजाराही रबाडाच्या जाळ्यात अडकला, त्याने ५३ धावा केल्या. यानंतर मैदानात आलेल्या ऋषभ पंतने निराशा केली परंतू हनुमा विहारीने सर्वात आधी रविचंद्रन आश्विन आणि त्यानंतर शार्दुल ठाकूरसोबत दोन महत्वपूर्ण भागीदारी रचत भारताची आघाडी २०० धावांच्या पुढे जाईल याची काळजी घेतली. शार्दुल ठाकूरनेही २४ बॉलमध्ये ५ फोर आणि १ सिक्स लगावत २८ धावा केल्या.
हनुमा विहारीने अखेरपर्यंत मैदानात तळ ठोकत भारताची बाजू आणखी मजबूत होईल याची काळजी घेतली. एन्गिडीने सिराजला आऊट करत भारताचा दुसरा डाव संपुष्टात आणला. दुसऱ्या डावात आफ्रिकेकडून रबाडा, एन्गिडी आणि जेन्सन यांनी प्रत्येकी ३-३ तर ऑलिव्हरने १ विकेट घेतली.