MI vs SRH : मॅच आली, पण प्ले ऑफची संधी गेली
साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादला रोखून मुंबई इंडियन्सने स्पर्धेचा शेवट गोड केला. पण त्यांना प्ले ऑफ गाठता आली नाही. नेट रन रेटने सामना जिंकण्यासाठी त्यांना 171 धावांच्या फरकाने सामना जिंकायचा होता. याच इराद्याने टॉस जिंकून मुंबई इंडियन्सने पहिल्यांदा बॅटिंग केली. इशान किशनच्या 84 धावांची खेळी आणि सूर्यकुमार यादवने केलेल्या 40 चेंडूतील 82 धावांच्या जोरावर मुंबई इंडियन्सने निर्धारित 20 षटकात 9 बाद 235 धावांपर्यंत मजल मारली होती. त्यानंतनर प्ले ऑफमध्ये पात्र ठरण्यासाठी मुंबई इंडियन्ससमोर हैदराबादला 65 धावांत रोखण्याचे आव्हान होते. ते त्यांना जमलं नाही. त्यामुळे सामना 42 धावांनी जिंकला असला तरी 14 गुणांसह त्यांना पाचव्या स्थानावर रहावे लागले.
धावांचा पाठलाग करताना कार्यवाहू कर्णधार मनिष पांड्येनं 41 चेंडूत नाबाद 69 धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीमुळे हैदराबादने निर्धारित 20 षटकात 8 बाद 193 धावांपर्यंतच मजल मारता आली. मुंबई इंडियन्सकडून निशम नील आणि बुमराह यांनी प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या. तर पियुष चावला आणि ट्रेंट बोल्टला 1-1 विकेट मिळाले.