IPL 2020 : आज हैदराबादसाठी ‘करो या मरो’, तर कोलकात्याचं लक्ष मुंबईच्या विजयाकडे
दुबई – मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने यंदा आयपीएलच्या प्लेऑफमध्ये आपले स्थान पक्के केले आहे. आता आज या हंगामातील प्लेऑफसाठीचा शेवटचा सामना मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद या संघात रंगणार आहे. या सामन्यात कोण बाजी मारणार, यावरून प्लेऑफमध्ये चौथे स्थान कोण मिळवणार हे ठरणार आहे. या चौथ्या स्थानासाठी हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन संघांमध्ये चुरस आहे. या सामन्याच्या निकालावर कोलकाता संघाचं भवितव्य अवलंबून आहे. आज मुंबईने हैदराबादला हरवलं तर कोलकाता नाईट रायडर्स संघाला प्ले ऑफचं तिकीट मिळेल आणि जर हैदराबादने मुंबईला पराभूत केलं तर हैदराबादचा संघ प्ले ऑफसाठी पात्र ठरेल. परिणामी कोलकात्याचं स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात येईल. त्यामुळे आजचा सामना हैदराबादला कोणत्याही परिस्थितीत जिंकावाच लागणार आहे, तर दुसरीकडे आजच्या सामन्यात मुंबईचा विजय व्हावा, यासाठी कोलकात्याचे चाहते प्रार्थना करत आहेत.
दरम्यान, डेव्हिड वॉर्नरच्या हैदराबाद संघाचं भवितव्य त्यांच्याच हातात आहे. हा संघ 12 गुणांसह गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. या संघाचे गुण कमी असले तरी नेट रनरेटच्या बाबतीत हा संघ मुंबईनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे या संघाला केवळ आजचा सामना जिंकायचा आहे. हैदराबादने मुंबई इंडियन्सला पराभूत केलं तर हा संघ गुणतालिकेत थेट तिसऱ्या स्थानावर पोहोचेल आणि त्यांना प्लेऑफचं तिकीटही मिळेल. मात्र जर हैदराबादचा संघ पराभूत झाला तर त्यांना स्पर्धेबाहेर व्हावे लागेल. त्यामुळे आज कोण जिंकतंय हे पाहणं महत्त्वाचं आहे.