#INDvsSL श्रीलंकेकडून भारताचा दारूण पराभव
कोलंबो – कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या टी-20 मालिकेच्या अंतिम आणि निर्णायक सामन्यात श्रीलंकेने भारताला 7 गडी राखून पराभूत केले. यासह श्रीलंकेने ही तीन सामन्यांची मालिका 2-1 ने जिंकली. श्रीलंकेने दोन वर्षानंतर द्विपक्षीय टी-20 मालिका जिंकली आहे. याआधी त्यांनी 2019 मध्ये पाकिस्तानविरुद्ध टी-20 मालिका जिंकली होती. त्याचबरोबर भारताविरुद्ध पहिल्यांदाच श्रीलंकेचा संघ टी -20 मालिका जिंकण्यात यशस्वी झाला आहे.
सामन्याच्या सुरुवातीला भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र भारतीय फलंदाजांनी निराशा केली. भारताचा कर्णधार शिखर धवन महत्त्वाच्या सामन्यात भोपळाही फोडू शकला नाही. पहिल्याच षटकात चमीराच्या गोलंदाजीवर धनंजया डि सिल्वा हाती झेल देऊन बाद झाला. त्यानंतर संघाच्या २३ धावा असताना देवदत्त पडिक्कल बाद झाला. संघाच्या २४ धावा असताना संजू सॅमसन बाद झाला. संजू सॅमसन शून्यावर बाद झाला. त्यानंतर ऋतुराज गायवाडही चांगली कामगिरी करू शकला नाही. त्याच्या वैयक्तिक १४ धावा असताना हसरंगाच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. नितीश राणाही भारताचा डाव सावरू शकला नाही. दासून शनाकाने त्याच्याच गोलंदाजीवर त्याचा झेल घेत तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर तळाच्या फलंदाजांनी डाव सारवण्याचा प्रयत्न केला. मात्र भुवनेश्वर कुमार १६ धावा करून बाद झाला. त्यानंतर चहर ५ धावा करून तंबूत परतला. तर वरुण चक्रवर्थी खातेही खोलू शकला नाही. या अटीतटीच्या सामन्यात हसरंगाने आपल्या भेदक गोलदांजीचे प्रदर्शन केले. त्याने चार षटकात केवळ ९ धावा दिल्या आणि भारताचे चार गडी बाद करत भारताला ८१ या धावसंख्येवर रोखले. विशेष म्हणजे काल हसरंगाचा वाढदिवस होता, त्यामुळे ही कामगिरी त्याच्या स्मरणात राहणार आहे.
भारताने ठेवलेले ८२ धावांचे लक्ष्य सोपे असल्याने श्रीलंकन फलंदाजांवर दडपण नव्हते. अविष्का फर्नांडो आमि मिनोद भानुका या जोडीने संघाला चांगली सुरुवात करून दिली. संघाची धावसंख्या २३ असताना श्रीलंकेला पहिला धक्का बसला. फर्नांडो चहरच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याने १८ चेंडूत १२ धावा केल्या. त्यांतर मिनोद भानुका जास्त वेळ मैदानात तग धरू शकला नाही. तो राहुल चहरच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. त्यानंतर सदीरा आणि धनंजया डिसिल्वा या जोडीने विजय सोपा केला. संघाची धावसंख्या ५६ असताना सदीरा बाद झाला. त्यानंतर डिसिल्वा आणि हसरंगा जोडीने श्रीलंकेला विजय मिळवून दिला. भारताकडून राहुल चहरने ४ षटकात १५ धावा देत ३ गडी बाद केले. मात्र इतर गोलंदाजांना श्रीलंकेचा एकही फलंदाज बाद करता आला नाही.