#INDvsENG आजपासून भारत-इंग्लंड तिसरी कसोटी
मुंबई – भारत विरुद्ध इंग्लंड सुरू असलेल्या पाच कसोटींच्या मालिकेतील तिसऱ्या कसोटीला आजपासून इंग्लंडमधील लीड्स येथील हेडींग्लि मैदानावर सुरुवात होणार आहे. भारताने या कसोटी मालिकेत १-०ची आघाडी घेतल्याने आता विजय निश्चित करण्यासाठी विराट कोहली सज्ज झाला आहे. तर इंग्लंडचा संघ ही कसोटी जिंकून मालिकेत बरोबरी करण्याच्या निर्धारासह मैदानात उतरणार आहे.
भारताकडून रोहित शर्मा आणि के. एल. राहुल या सलामीवीरांची कामगिरी सरस ठरली आहे. या दोघांचा भन्नाट फॉर्म टीम इंडियासाठी फायद्याचा ठरत आहे. मात्र चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांचे अपयश भारतासाठी चिंताजनक आहे. तर विराटलाही अद्याप लय सापडलेली नाही. लीड्सवर छाप पाडण्यासाठी तो उत्सुक आहे. तसेच दुसरीकडे इंग्लंडकडून जो रुट वगळता अन्य कोणालाही चांगला फॉर्म गवसलेला नाही. त्यात इंग्लंडला मार्क वूडच्या दुखापतीमुळे मोठा फटका बसला आहे. आता वूडच्या जागी साकिब मेहमूदला पदार्पणाची संधी मिळण्याची शक्यता आहे.