#INDvsAUS 4th test: वॉशिंग्टन सुंदर, शार्दूल ठाकूरचे झुंजार अर्धशतक; ऑस्ट्रेलियाकडे ३३ धावांची आघाडी
![#INDvsAUS 3rd test: Washington beautiful, Shardul Thakur's fierce half century; Australia lead by 33 runs](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/01/shardul-thAKUR-SUNDAR.jpg)
ब्रिस्बेन – ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारतातील चौथ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ काल पावसाच्या व्यत्ययामुळे थांबविण्यात आला. त्यामुळे त्या खेळाची भरपाई होण्यासाठी आज सामन्याच्या तिसऱ्या दिवसाच्या खेळाला लवकर सुरुवात झाली. भारताने आज सकाळी कालच्या 2 बाद 62 धावांवरुन सुरुवात केली. त्यानंतर शार्दूल ठाकूर आणि कसोटी पदार्पण करणारा वॉशिंग्टन सुंदर या दोघांच्या झुंजार अर्धशतकाच्या जोरावर भारताने 369 धावांवर मजल मारली. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियाकडे 33 धावांची आघाडी आहे.
ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 369 धावा केल्यानंतर मैदानात उतरलेल्या भारताची सुरुवात चांगली झाली नाही. काल भारताने डावाच्या सुरुवातीलाच सलामीवीर शुबमन गिल आणि रोहित शर्माची विकेट गमावली. आज भारताच्या मधल्या फळीतील प्रमुख फलंदाज चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार अजिंक्य रहाणे या दोघांमध्ये मोठी भागिदारी होणे गरजेचे होते. परंतु 45 धावांची भागिदारी झाल्यानंतर चेतेश्वर पुजारा (25) जोश हेजलवूडच्या गोलंदाजीवर स्वस्तात माघारी परतला. त्यानंतर अजिंक्य रहाणेने मयंक अग्रवालच्या साथीने किल्ला लढवण्यास सुरुवात केली. मयंकला खेळपट्टीवर सेट होता यावे यासाठी रहाणे जास्तीत जास्त चेंडू स्वतः खेळत होता. तर दुसऱ्या बाजूला मयंकही चांगली फलंदाजी करत होता. मात्र तितक्यात भारताला चौथा धक्का बसला. मिचेल स्टार्कच्या चेंडूवर कर्णधार अजिंक्य रहाणे (37) झेलबाद झाला. तोपर्यंत भारताने 4 बाद 161 धावांपर्यंत मजल मारली होती. मग खेळपट्टीवर सेट झालेल्या मयंक अग्रवाल आणि नुकताच मैदानात आलेल्या ऋषभ पंतवर सामन्याची संपूर्ण जबाबदारी आली. परंतु लंचनंतर मैदानात आलेल्या भारतीय संघाला पहिल्याच षटकात जोरदार धक्का बसला. खेळपट्टीवर मयंक अग्रवाल 38 धावांवर बाद झाला आणि भारताची अवस्था 5 बाद 161 अशी झाली. त्यानंतर मात्र भारतीय संघाच्या अडचणी वाढलेल्या असताना सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या ऋषभ पंतने आक्रमक पवित्रा घेतला. त्याने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांवर जोरदार प्रहार सुरु केला. परंतु तो 23 धावांवर बाद झाल्याने भारताला सहावा धक्का बसला. जोश हेजलवूडने पंतला बाद केले.
मग भारताची अवस्था 6 बाद 186 अशी झाली. मग मैदानात उतरलेला जलदगती गोलंदाज शार्दुल ठाकूर आणि फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदर या दोघांनी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना चोख प्रत्युत्तर दिले. मराठमोळ्या शार्दूल ठाकूरने झुंजार अर्धशतकी खेळी केली. त्याचं कसोटीतील हे पहिलंच अर्धशतक ठरलं आहे. तर त्यापाठोपाठ वॉशिंग्टन सुंदरनेही आपल्या पदार्पणातील सामन्यात झुंजार अर्धशतक लगावलं आहे. या दोघांच्या शतकी भागीदारीमुळे टीम इंडियाने 300 पार मजल मारली आहे. सातव्या विकेटसाठी शार्दूल आणि वॉशिंग्टन सुंदरने एकूण 123 धावांची निर्णायक भागीदारी केली. मात्र शार्दूल ठाकूर एकूण 115 चेंडूत 9 चौकार आणि 2 षटकारांसह एकूण 67 धावांची खेळी करत माघारी परतला. त्यानंतर नवदीप सैनी 5 धावांवर बाद झाला. त्यानंतर सिराज (१३) आणि नटराजन (१) बाद झाले. अशाप्रकारे भारताचा पहिला डाव 336 धावांवर आटोपला. तर कांगारुंना दुसऱ्या डावात केवळ 33 धावांची आघाडी मिळाली. दरम्यान, ऑस्ट्रेलियाकडून जोश हेझलवुडने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. तर मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्सने प्रत्येकी 2 व फिरकीपटू नॅथन लायनने 1 विकेट घेतली.