#INDvsAUS 3rd test: भारताचा पहिला डाव २४४ धावांत आटोपला
![#INDvsAUS 3rd test: India's first innings totaled 244 runs](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/01/ashwin-runaout-ind-vs-aus.jpg)
सिडनी – आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसऱ्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू आहे. ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाचा पहिला डाव २४४ धावांवर आटोपला आहे. त्यामुळे कांगारुंना दुसऱ्या डावात 94 धावांची आघाडी मिळाली आहे. दरम्यान, भारताकडून चेतेश्वर पुजारा (५०) आणि शुबमन गिल (५०) यांचा अपवाद वगळता एकाही भारतीय फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. रोहित शर्मा (२६), अजिंक्य रहाणे (२२) आणि ऋषभ पंत (३६) यांना चांगल्या सुरुवातीनंतर मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले. रविंद्र जाडेजानं अखेरीस काही अप्रतिम फटके मारत धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला. जाडेजानं नाबाद २८ धावांची खेळी केली. तर ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. त्याला जोश हेझलवूडने 2 विकेट्स घेत चांगली साथ दिली. तसेच मिचेल स्टार्कने 1 विकेट घेतला आणि भारताचे 3 फलंदाज धावचीत झाले.
भारतीय फलंदाजांनी हराकिरी केल्यामुळे तिसऱ्या कसोटी सामन्यावर ऑस्ट्रेलिया संघाने वर्चस्व मिळवले आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघाने अफलातून क्षेत्ररक्षणाचे प्रदर्शन केले. कांगारुंनी भारताच्या तीन फलंदाजांना धावबाद केले. यामध्ये हनुमा विहारी (४), आर. अश्विन (१०) आणि जसप्रीत बुमराह (००) यांचा समावेश आहे.
आज तिसऱ्या दिवसाचा खेळाला सुरुवात झाल्यानंतर कमिन्सच्या सुरेख चेंडूवर अजिंक्य रहाणे क्लीन बोल्ड झाला. अजिंक्य रहाणे बाद झाल्यानंतर भारतीय संघाची फलंदाजी कोसळली. पंत-पुजारा यांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र नव्या चेंडूवर हेजलवूडने पंतला बाद करत ही जोडी फोडली. त्यानंतर पुजाराही लगेच बाद झाला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने सामन्यावर पकड मिळवली.