IND vs AUS : शतकवीर विराटने मोडला सचिनचा ‘हा’ विक्रम
कर्णधार विराट कोहलीचे शतक (१०४) आणि महेंद्रसिंह धोनीच्या (५५) अर्धशतकी खेळीमुळे टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर ४ चेंडू व ६ गडी राखून विजय मिळवला. नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यानुसार ऑस्ट्रेलियाने २९८ धावा ठोकल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाला अखेरच्या षटकात ७ धावांची गरज होती. धोनीने पहिल्याच चेंडूवर षटकार लगावला आणि नंतरच्या चेंडूवर एकेरी धाव घेत संघाला विजय मिळवून दिला. या विजयाबरोबरच भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. विराट कोहलीला सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
सामनावीराच्या पुरस्काराबरोबरच विराटने आणखी एक पराक्रम केला. विराटने या सामन्यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडीत काढला. विराटने ३९वे एकदिवसीय शतक ठोकले. ३९ शतक ठोकण्यासाठी विराटला केवळ २१० डाव खेळावे लागले. मात्र तेंडुलकरला ३९ एकदिवसीय शतकांसाठी ३५० डाव खेळावे लागले होते.