#AusvInd : भारत पराभवाच्या छायेत; चौथ्या दिवसअखेर भारत 5 बाद 112
- भारताला विजयासाठी आणखी 175 धावांची आवश्यकता
पर्थ – भारताला दुसऱ्या कसोटीत विजयासाठी 175 धावांची आवश्यकता असून चौथ्या दिवसअखेर भारताने 5 बाद 112 धावसंख्येपर्यत मजल मारली आहे. भारताचे आघाडीचे फलंदाज लवकर तंबूत परतल्याने भारत पराभवाच्या छायेत आहे.
दरम्यान मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांच्या भेदक गोलंदाजीपुढे ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डाव्यात 243 धावांवर रोखण्यात भारताला यश आले. पहिला डावातील 43 धावांची आघाडी आणि दुसऱ्या डावातील 243 धावा मिळून दुसरी कसोटी जिंकण्यासाठी भारताला 287 धावांचे आव्हान मिळाले आहे. विजयासाठी 287 धावांचा पाठलाग करताना भारताची अवस्था बिकट झाली आहे.
भारताचा सलामीवीर लोकेश राहुल पुन्हा एकदा अपयशी ठरला असून तो शून्यावर माघारी परतला आहे. तर मुरली विजय 20, चेतेश्वर पूजारा 4, विराट कोहली 17 आणि अंजिक्य रहाणे 30 धावांवर तंबूत परतला आहे. त्यामुळे भारताच्या विजयाच्या आशा धूसर झाल्या आहेत.