विश्वचषक न जिंकल्याची खंत अजुनही मनात कायम – रोहित शर्मा
भारतीय वन-डे आणि टी-२० संघाचा उप-कर्णधार रोहित शर्मासाठी २०१९ हे वर्ष चांगलं गेलं आहे. फलंदाजीत रोहितने या वर्षात खोऱ्याने धावा ओढल्या. वेस्ट इंडिजविरुद्ध अखेरच्या वन-डे सामन्यातही रोहितने अर्धशतकी खेळी करत भारतीय संघाला भक्कम सुरुवात करुन दिली. यादरम्यान त्याने अनेक विक्रमही मोडले, मात्र असं असूनही त्याच्या मनात एक खंत अजुनही कायम आहे.
विंडीजविरुद्ध मालिकेत धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या रोहितला मालिकावीराता किताब देण्यात आला. यावेळी बोलत असताना रोहितने आपली खंत बोलून दाखवली. “हे वर्ष ज्यापद्धतीने गेलं त्यासाठी मी खरंच स्वतःला भाग्यवान समजतो. विश्वचषकात यशस्वी झालो असतो तर अधिक चांगलं झालं असतं, ती खंत माझ्या मनात कायम राहिल. मात्र संघाचा या वर्षातला खेळ आश्वासक झाला आहे. कसोटी क्रिकेट असो किंवा मर्यादीत षटकांचं क्रिकेट टीम इंडियाने हे वर्ष गाजवलं आहे.” रोहितने आपल्या भावना व्यक्त केल्या.