विराटने पराभवासाठी दिलं छोट्या सीमारेषेचं कारण
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/07/Virat-Kohli-Practice.jpg)
विश्वचषक स्पर्धेतील महत्वाच्या सामन्यात रविवारी इंग्लंडने भारताचा ३१ धावांनी पराभव केला. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या मते पराभवासाठी अन्य कारणांबरोबर मैदानाचे आकारमान सुद्धा एक कारण आहे. एजबॅस्टन मैदानाची सीमारेषा एकाबाजूने ५९ मीटर इतकीच आहे. सामन्याच्या सुरुवातीला इंग्लंडच्या सलामीवीरांनी एकाबाजूने छोटया असलेल्या सीमारेषेचा पुरेपूर फायदा उचलला. सामना संपल्यानंतर विराट कोहलीने मैदानाच्या आकारमानाबद्दलची नाराजी बोलून दाखवली.
सलामीवीर जॉनी बेअरस्टोने यझुवेंद्र चहल आणि कुलदीप यादव या भारताच्या फिरकी गोलंदाजांवर हल्लाबोल करताना एका बाजूने छोटया असलेल्या सीमारेषेच पुरेपूर फायद उचलला. वर्ल्डकप स्पर्धेत पहिले शतक झळकवणाऱ्या बेअरस्टोने पहिल्या विकेटसाठी जेसन रॉय (६६) बरोबर १६० धावांची भागीदारी केली. कुलदीप आणि चहल दोघांना छोटया सीमारेषेचा मोठा फटका बसला. चहलने १० षटकात ८८ धावा आणि कुलदीपने १० षटकात ७२ धावा मोजल्या.
कुलदीप आणि चहलने अजून चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करायला हवी होती हे विराटने मान्य केले पण छोटया सीमारेषेने त्यांच्या अडचणी आणखी वाढवल्या असे मत विराटने व्यक्त केले. छोटी सीमारेषा असलेल्या बाजूला फलंदाज तुम्हाला रिव्हर्स स्विपच्या फटक्याचा वापर करुन षटकार मारत असेल तर फिरकी गोलंदाज म्हणून फार काही करु शकत नाही. छोटया सीमारेषेमुळे धावा रोखणे कठिण बनले असे विराट म्हणाला. सामन्याच्या सुरुवातीलाच छोटया सीमारेषेबद्दल भारताने आपली चिंता व्यक्त केली होती. विराटने पराभवासाठी मैदानाचे कारण दिले असले तरी इंग्लंडच्या गोलंदाजांनाही श्रेय दिले आहे.