मुंबईकर फिरकीपटू देणार ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना धडे
भारतीय संघ २४ फेब्रुवारीपासून ऑस्ट्रेलियाशी आपल्या भूमीत क्रिकेट मालिका खेळणार आहे. भारताच्या भूमीत भारताला पराभूत करणे हे खूप कठीण आहे असा आतापर्यंतचा इतिहास आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या संघाने एका मुंबईकर फिरकीपटूची मदत घ्यायची ठरवली आहे. भारतीय खेळपट्ट्यांवर फिरकी प्रभावी ठरते, याची कल्पना असल्यामुळे ऑस्ट्रेलियाचे फलंदाज प्रदीप साहू या मुंबईकर फिरकीपटूकडून शिकवणी घेणार आहे.
भारताच्या संघात युझवेन्द्र चहल आणि कुलदीप यादव हे दोन मनगटी फिरकीपटू आहेत. परदेशी खेळपट्ट्यांवरही हे दोघे प्रभावी ठरले आहेत. त्यामुळे या फिरकी गोलंदाजांचा सामना करण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी पंजाबचा माजी क्रिकेटपटू आणि सध्या मुंबईकर असलेला मनगटी फिरकीपटू प्रदीप साहूचे याचे मार्गदर्शन घेणार आहेत.
प्रदीप साहू
एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत प्रदीप म्हणाला, ‘ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना मनगटी फिरकी गोलंदाजांविरुद्ध सराव करणे महत्वाचे वाटते. त्यामुळे संपूर्ण भारत दौऱ्यात मी त्यांच्यासोबत असणार आहे. आंतरराष्ट्रीय संघासोबत राहण्याची मला प्रथमच संधी मिळाली आहे. मनगटी फिरकी गोलंदाजांचा सामना करणे अजिबात सोपे नसते. त्यांच्याकडे चेंडू टप्प्यावर फिरवण्याचे कौशल्य असते. म्हणूनच मला ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना उत्तम मार्गदर्शन द्यायचे आहे.
मला मार्गदर्शक म्हणून नेमण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने BCCI ला पत्र लिहिले होते. त्यावर BCCI मान्यता दिल्यानंतरच मी भारत दौऱ्यात त्यांच्याबरोबर असणार आहे, असेही प्रदीपने सांगितले. दरम्यान, प्रदीपने IPL मध्ये राजस्थान रॉयल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब या संघांचे प्रतिनिधित्व केले आहे.