न्यूझीलंडने भारताचा पराभव करून देखील टीम इंडियासाठी एक ‘Good News’
भारतीय संघाचा यजमान न्यूझीलंडने चांगलाच धुव्वा उडवला. ख्राईस्टचर्च कसोटी सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी यजमान न्यूझीलंडने विजयासाठी दिलेलं १३२ धावांचं आव्हान ७ गडी राखत पूर्ण केलं. यामुळे वन-डे मालिके पाठोपाठ कसोटी मालिकेतही भारतीय संघाला पराभवाचं तोंड पहावं लागलं. कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील भारतीय संघाचा हा पहिला मालिका पराभव ठरला. एकदिवसीय सामन्यापाठोपाठ कसोटी सामन्यात पराभूत करून न्यूझीलंडने भारताला दौऱ्यातील दुसरा ‘व्हाईटवॉश’ दिला. पण या लाजिरवाण्या पराभवानंतरदेखील भारतासाठी एक ‘गुड न्यूज’ आहे.
कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील पहिला मालिका पराभव स्वीकारून देखील भारतीय संघ गुणतालिकेत अव्वल स्थान टिकवून आहे.
भारताने ९ पैकी ७ कसोटी सामने जिंकत ३६० गुणांसह आपले अग्रस्थान कायम राखले आहे. तर ऑस्ट्रेलियाने देखील १० पैकी ७ कसोटी सामने जिंकून २९६ गुणांसह आपले दुसरे स्थान कायम ठेवले आहे. या गुणतालिकेत भारताला पराभवाचा धक्का दिल्याने न्यूझीलंडचा संघ ७ पैकी ३ सामने जिंकून १८० गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे.