खेळाडूंनी जय-पराजयाचा विचार करू नये : ललिता बाबर
कराड – राज्यातील खेळाडू मैदानी स्पर्धेत चांगला खेळ करत आहेत. खेळाडूंना सध्यस्थितीत चांगले वातावरण देशात निर्माण झाले आहे. त्यामुळे शालेय स्तरावरील खेळाडूंनी अथक परिश्रम, कष्ट घेऊन राज्य, देश पातळीवर कसे प्रतिनिधीत्व करता येईल? याचा विचार करावा. कष्ट केल्यास त्याचे फळ मिळतेच, मात्र त्याचवेळी जय-पराजयाचा विचार करू नका, असा सल्ला अर्जुन पुरस्कार प्राप्त ऍथलेटिक्स खेळाडू ललिता बाबर हिने दिला आहे.
विद्यानगर (सैदापूर, ता. कराड, जि. सातारा) येथील वेणूताई चव्हाण महाविद्यालयातील पी. डी. पाटील क्रीडा नगरीत रविवारपासून राज्यस्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेस प्रारंभ झाला. शिवाजी शिक्षण संस्थेचे वेणूताई चव्हाण महाविद्यालय, जिल्हा क्रीडा विभाग तसेच राज्य शासन यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित चार दिवस चालणाऱ्या या स्पर्धेचे उद्घाटन ललिता बाबर हिच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक, प्रांताधिकारी हिंमत खराडे, शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव प्रकाश पाटील, शंकराप्पा संसुद्दी यांच्यासह मान्यवर उपस्थितीत होते.