कोहलीच्या फलंदाजीने चांगलाच धडा दिला- सॅम करन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/08/Sam-Karan-696x392.jpg)
बर्मिंगहॅम: भारताविरुद्ध आपला केवळ दुसरा कसोटी सामना खेळणाऱ्या सॅम करनने जवळपास निम्म्या भारतीय संघाला तंबूचा रस्ता दाखवला, मात्र विराट कोहलीच्या दणकेबाज खेळीने आम्हाला आमच्या गोलंदाजीच्या डावपेचांचा फेरविचार करावा लागला, अशी कबुली सॅम करनने दुसऱ्या दिवशीचा खेळ संपल्यानंतर दिली.
भारत व इंग्लंड दरम्यान सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा पहिला डाव बिनबाद 50 धावांवरून तीन बाद 59 अशी अवस्था करणाऱ्या सॅम करनची ही दुसरीच कसोटी आहे. दुसऱ्याच सामन्यात भारतीय संघातील आघाडीच्या फळीतील खेळाडूंना बाद करत आपल्या गोलंदाजीची धार दाखवणाऱ्या करनने सामन्यानंतर तळातील फलंदाजांना सोबतीला घेऊन फलंदाजी करणाऱ्या भारतीय कर्णधार विराट कोहलीची प्रशंसा करताना केली. करन म्हणाला की, विराटची ही खेळी आमच्या गोलंदाजांना चांगलाच धडा देणारी होती, त्याने तळातील फलंदाजांना सोबतीला घेऊन आम्हाला दिलेले आव्हान धक्का देणारे होते.
आम्ही भारताचे पाच फलंदाज केवळ 100 धावांतच तंबूत परतवले होते. त्यामुळे ही कसोटी जिंकण्याचा विश्वास आम्हाला दुसऱ्याच दिवशी वाटत होता. मात्र विराटने नऊ, दहा आणि अकरा क्रमांकावरील फलंदाजांना सोबतीला घेऊन केलेली खेळी ही आम्हाला आमच्या गोलंदाजीच्या शैलीत बदल कारायला भाग पाडणारी होती, असे सांगून करन म्हणाला की, आम्ही भारताचे पहिले पाच फलंदाज झटपट बाद केले. मात्र त्यांच्या तळाच्या फलंदाजांनी आम्हाला त्रास देण्याचे काम केले. याचे श्रेय खरे तर विराट कोहलीच्या खेळीलाच दिले पाहिजे. कारण तुमचे महत्त्वाचे 6 फलंदाज दीडशे धावांच्या आत तंबूत परततात, तेव्हा तुम्ही किती धावा करू शकाल, याच्यावर तुमचाच विश्वास नसतो. मात्र विराटने आत्मविश्वास न गमावता केलेल्या या खेळीतून मला आणखी खूप काही शिकायचे आहे हे दाखवून दिले आहे. कारण हा माझा दुसराच आंतरराष्ट्रीय सामना आहे त्यामुळे विराटच्या खेळीने मला माझ्या गोलंदाजीच्या शैलीत आवश्यक बदल करावे लागतील या वस्तुस्थितीची जाणीव करून दिली आहे.
यावेळी आपल्या कामगिरीबद्दल बोलताना करन म्हणाला की, खरेतर आजचा दिवस माझ्यासाठी संस्मरणीय ठरला. तुम्ही गोलंदाजीला येता आणि तुम्हाला लागलीच बळी देखील मिळतात, हे सगळे स्वप्नवत होते. चेंडू स्विंग होतोय की नाही, हे तुम्ही गोलंदाजीला आल्याशिवाय सांगू शकत नाही. गोलंदाजीला आल्यावर अनेक चेंडू टाकून झाल्यानंतरही खेळपट्टी आणि चेंडूचा स्विंग यांचा समतोल जमत नसतो. मात्र, माझ्या नशिबाने मी गोलंदाजीला आलो तेव्हा वातावरण ढगाळ होते आणि चेंडू देखील बऱ्यापैकी जुना झालेला होता. त्यामुळे मला पहिल्याच चेंडूपासून स्विंग मिळाला आणि मी भारतीय फलंदाजांना बाद करण्यात यशस्वी ठरलो.
तसेच खेळपट्टीबाबत बोलताना करन म्हणाला की, या सामन्यासाठी तयार करण्यात आलेली खेळपट्टी ही गोलंदाज आणि फलंदाज दोघांनाही सारखीच मदत करीत आहे. त्यामुळे कोणत्या गोलंदाजाला किती मार खावा लागेल किंवा कोणत्या गोलंदाजाला किती बळी मिळतील हे सांगणे कठीण असणार आहे. तसेच त्यामुळे भारतीय संघासमोर किती धावांचे आव्हान ठेवल्यास विजय मिळवता येईल हे सांगणे शक्य नाही. मला वाटते की, ही कसोटी अखेरच्या क्षणापर्यंत रंगतदार होईल.