कर्णधार विराट कोहलीला खेलरत्न पुरस्कार जाहीर
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि वेटलिफ्टर मीराबाई चानू यांना राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अर्जुन पुरस्कार समितीने कर्णधार विराट कोहली आणि मीराबाई चानू यांची शिफारस केली होती.
कर्णधार कोहली याला नुकत्याच झालेल्या इंग्लंड दौऱ्यात कसोटी मालिकेतील मालिकावीराचा किताब मिळाला होता.विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध ४-१ अशा फरकाने पराभूत झाला. परंतु या मालिकेत त्याने फलंदाजीने सर्व क्रिकेटरसिकांना खुश केले. विराट कोहलीने या मालिकेत सर्वाधिक ५९३ धावा केल्या.
तर मीराबाई चानू हिचीही प्रगती वाखाणण्याजोगी झाली आहे. मीराबाई चानू हिने ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये सुवर्ण कामगिरी केली होती. ४८ किलो वजनी गटातील वेटलिफ्टींग प्रकारात आपली छाप पाडत तिने भारताला सुवर्णपदक मिळवून दिले होते. याशिवाय, २०१७मध्ये मीराबाई चानू हिने जागतिक वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये विश्वविक्रम नोंदवून जेतेपदाला गवसणी घातली होती. तिने ४८ किलो वजनी गटात १९४ किलो (स्नॅचमध्ये ८५ आणि क्लीन-जर्कमध्ये १०९ किलो) वजन उचलून भारताला दोन दशकांनंतर सुवर्णपदक मिळवून दिले. अशी कामगिरी करणारी चानू दुसरी भारतीय वेटलिफ्टर ठरली होती. २२ वर्षांपूर्वी कर्नाम मल्लेश्वरी हिने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण कामगिरी केली होती.