ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसरा ट्वेन्टी-२० सामना जिंकण्यास भारत उत्सुक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/0233.jpg)
सिडनी – पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यावर वर्चस्व गाजवल्यानंतर भारतीय संघ आज ऑस्ट्रेलियाविरुद्धचा दुसरा सामना जिंकून मालिका विजयासाठी उत्सुक आहे. भारताला एकदिवसीय मालिका १-२ अशी गमवावी लागली होती. मात्र त्यानंतर ऑस्ट्रेलियाला पराभवाची परतफेड करण्याची सर्वात मोठी संधी आज भारताकडे आहे.
विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघाने पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात दमदार विजय मिळवला. या विजयासह भारताने ट्वेन्टी-२० मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे आता दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात भारतीय संघ कशी कामगिरी करतो, यावर सर्वांचे लक्ष असेल. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाच्या संघासाठी हा सामना निर्णायक असेल. कारण या सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला तर या मालिकेतील त्यांचे आव्हान संपुष्टात येऊ शकते. त्यामुळे या सामन्यात नेमका कोणता संघ बाजी मारतो, हे पाहणे रोमांचक असेल.
दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याने दुखापतीमुळे ट्वेन्टी-२० मालिकेतून माघार घेतली असून त्यात आता कर्णधार एरोन फिंचच्या दुखापतीची भर पडली आहे. मांडीचे स्नायू ताणले गेल्याने आजच्या सामन्यात फिंचच्या समावेशाविषयी साशंकता व्यक्त केली जात आहे. तर मागील सामन्यात भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाच्या डोक्याला चेंडू आदळल्यामुळे त्याच्या जागी यजुर्वेद्र चहलला भारतीय संघात स्थान मिळाल्यानंतर त्याने गोलंदाजीत आपली छाप पाडत भारताला विजय मिळवून दिला. त्यानंतर कर्णधार कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी विजयी संघात कोणतेही बदल न करण्याचे संकेत दिले आहेत.