भाजपा आमदार राहुल कुल यांच्यावर ५०० कोटींच्या गैरव्यवहाराचा संजय राऊतांचा आरोप
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहित कारवाईची मागणी
मुंबई : खासदार संजय राऊत यांनी भाजपाचे आमदार राहुल कुल यांच्यावर ५०० कोटींच्या गैरव्यवहाराचा आरोप केला आहे. याबद्दल त्यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहित या घोटाळ्याबद्दल सांगितलं आहे. तसंच या प्रकरणी कारवाईची मागणीही केली आहे.
या आरोपनंतर त्यांन दिल्लीत पत्रकार परिषद घेत भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांना लक्ष्य केलं आहे. या घोटाळ्याची कागदपत्रे सोमय्यांकडे चार वेळा पाठवण्यात आली होती. मात्र, त्यांनी या घोटाळ्याची तक्रार करण्यास नकार दिला, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
माझ्याकडे १७ कारखान्यांतील घोटाळ्यांची प्रकरणं आहेत. त्यापैकी हे पहिलं प्रकरण आहे. भीमा साखर कारखान्याचं प्रकरण मी किरीट सोमय्या यांच्याकडे चार वेळा फपाठवलं होतं. दौडचे शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्ते चार वेळा हे प्रकरण त्यांच्याकडे घेऊन गेले, पण त्यांनी याची तक्रार करण्यास नकार दिला. महाविकास आघाडीचं काही प्रकरण असेल तर माझ्याकडे घेऊन, मी ते प्रकरण ईडीपर्यंत घेऊन जाईन, पण या बाकी कोणत्या प्रकरणाला हात लावणार नाही, असं संजय राऊत म्हणाले.
भामा साखर कारखान्यातील घोटाळ्याचे दोन हजार पानाचे पुरावे आज देवेंद्र फडणवीस यांना मिळतील. पण तरीही मी त्यांना पत्र लिहीत ब्रीफ केलं आहे. भविष्यात अशी १७ ते १८ साखर कारखान्याची प्रकरणं मी देवेद्र फडणवीस यांना पाठवणार आहे, असंही राऊत म्हणाले.