‘हिंदुस्थानासाठी पंडित नेहरूंचे नखाएवढेही योगदान नाही’; संभाजी भिडेंचं पुन्हा वादग्रस्त विधान
मुंबई : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विषयी वादग्रस्त विधान केलं आहे. यावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. असं असताना संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. हिंदुस्थानासाठी पंडित नेहरूंचे नखाएवढेही योगदान नाही, असं संभाजी भिडे यांनी म्हटलं आहे. यावरून आता राजकारण पुन्हा तापण्याची शक्यता आहे. ते यवतमाळ येथे आयोजित व्याख्यानात बोलत होते.
संभाजी भिडे म्हणाले की, नेहरूंना हिंदुस्थानाप्रती कोणतेही प्रेम नव्हते. देशासाठी नेहरूंचे नखभरही योगदान नसताना ते पंतप्रधान झाले. नेहरूंनी चीनसोबत केलेला ‘पंचशील’ करार हिंदुस्थानाला मारक ठरला. त्यांच्या चुकीमुळे चीनने भारताचा पराभव केला आणि इशान्येकडील भूभाग गिळंकृत केला. हा भूभाग परत मिळविण्यासाठी आजपर्यंत कोणीच प्रयत्न केले नाहीत. सर्व लोकप्रतिनिधीही गप्प आहेत, याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. हिंदुंना युद्धशास्त्राची गरज आहे. त्यासाठी अद्ययावत लष्करी शाळाच काढणार आहे, असंही संभाजी भिडे म्हणाले.
हेही वाचा – पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसची कार्यकारिणी बरखास्त
महात्मा गांधी यांच्याविषयी संभाजी भिडे नमकं काय म्हणाले?
मोहनदास हे करमचंद यांच्या चौथ्या पत्नीचे पुत्र होते. करमचंद हे ज्या मुस्लीम जमीनदाराकडे कामाला होते, त्याच जमीनदाराची मोठी रक्कम चोरून ते पळून गेले होते. त्यामुळे त्या चिडलेल्या मुस्लीम जमीनदाराने करमचंद यांच्या पत्नीलाच पळवून घरी आणले, त्यांच्याशी पत्नीसारखा व्यवहार केला. त्यामुळे करमचंद गांधी हे मोहनदास यांचे खरे वडील नसून ते त्याच मुस्लीम जमीनदाराचे पुत्र आहेत. मोहनदास यांचा सांभाळ व शिक्षणही त्याच मुस्लीम पालकाने केले, असं संभाजी भिडे यांनी म्हटलं आहे.