प्रवास महागणार ! येत्या 1 एप्रिलपासून टोल दरात होणार 3 टक्क्यांनी वाढ

Pune-Mumbai Expressway Toll : वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाला आहे. काही दिवसांपूर्वीच जीवनावश्यक वस्तू असलेल्या दूधाच्या दरातही 2 रुपयांनी वाढ करण्यात आली. एकीकडे महागाईने होरपळणाऱ्या सर्वसामान्यांना आता टोल दरवाढीचाही फटका बसणार आहे.
मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना 1 एप्रिलपासून टोल दरवाढीचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. त्यामुळे मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांना अधिक पैसे खर्च करावे लागतील.
येत्या 1 एप्रिलपासून पुणे-मुंबई महामार्गाच्या टोलमध्ये 3 टक्क्यांनी वाढ होणार असल्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यानुसार, आता मुंबई -पुणे एक्सप्रेस महामार्गावरुन प्रवास करताना चारचाकी वाहनांच्या एकेरी प्रवासासाठी अतिरिक्त 5 रुपये मोजावे लागणार आहेत.
हेही वाचा – मावळ लोकसभा मतदारसंघातील रेल्वेचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी रेल्वेमंत्री सकारात्मक
तर परतीच्या प्रवासासाठी 10 रुपये द्यावे लागणार आहे. तसेच इतर श्रेणींतील वाहनांसाठी 15 ते 20 रुपयांपर्यंतची टोल दरवाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीत मोडणाऱ्या सर्व रस्त्यांवर ही टोल दरवाढ लागू होणार आहे.
येत्या 1 एप्रिलपासून प्रत्येक टोल नाक्यावर फास्ट टॅग लावणे अनिवार्य असणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हा निर्णय घेतला आहे. जर तुम्ही रोख, कार्ड किंवा यूपीआयद्वारे टोल भरला तर तुम्हाला टोलचे पैसे डबल भरावे लागतील. टोलची प्रक्रिया अधिक कार्यक्षम करण्यासाठी आणि टोलवरील लागणारा वेळ आणि फास्ट टॅगचा गोंधळ टाळण्यासाठी प्रत्येक वाहनांना फास्ट टॅग लावणे अनिवार्य करण्यात आले आहे.