“ठाकरे सरकार फक्त म्हणण्यापुरते, प्रत्यक्षात लाभ मात्र शरद पवारांना”
!["The Thackeray government is just saying, in fact the benefits are for Sharad Pawar"](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/03/IMG-20211020-WA0005.jpg)
दापोली | राज्यात ठाकरे सरकार आहे, असे आम्ही म्हणतोय मात्र प्रत्यक्ष लाभ पवार सरकार घेत असल्याचे वक्तव्य शिवसेनेचे खासदार गजानन किर्तीकर यांनी केले आहे. एका आमदाराला त्याच्या मतदार संघात विकास कामासाठी शासनाकडून निधी मिळविण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात, असं त्यांनी सांगितलं. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील शिर्दे-वडवली, ब्राम्हणवाडी ते कोळबांद्रे रस्त्याच्या डांबरीकरण भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी बोलताना गजानन कीर्तिकर म्हणाले की, राज्यात विकास कामांच्या निधीमध्ये पळवापळवी केली जात आहे. ग्रामविकास मंत्रालयाच्या योजनांमधून निधी मिळविण्यासाठी मोठी स्पर्धा पाहायला मिळते. आम्हाला मुंबईमध्ये हा प्रश्न उद्भवत नाही. कारण मुंबईत नागरोत्थान आणि नगरविकासचा निधी मिळतो, तसेच मुख्यमंत्र्यांच्या मागे लागून आम्ही निधी मिळवितो. परंतु विकास कामांच्या निधीमध्ये पळवापळवी केली जात आहे. आम्ही म्हणायचं की आमचं ठाकरे सरकार पण प्रत्यक्ष लाभ मात्र पवार सरकार घेते, असे गजानन किर्तीकर म्हणाले. यावेळी त्यांनी कार्यक्रमात उपस्थित राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना टोला लगावला.