राज्य सरकारने तातडीने निवडणुका घ्याव्यात : खासदार सुळे
जनसंवाद उपक्रमाचे आयोजन : आयुक्तांशी खासदार संवाद साधणार
पुणे | पालिकेचे पदाधिकारी असताना नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेत होते. मात्र, सध्या असलेले प्रशासकीय अधिकाऱ्यांना नागरी समस्या सोडविण्यासाठी येणारे अपयश हे सातत्याने अधोरेखित होत आहे. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने निवडणूका घाव्यात, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.
पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस भूपेंद्र मोरे व स्वप्नपूर्ती महिला फाऊंडेशनच्या अध्यक्षा नेहा मोरे यांच्या वतीने जनसंवाद उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी स्थानिक नागरिक, पुणे महानगरपालिकेतील अधिकारी यांना एकाच मंचावर आणण्यात आले. यावेळी नऱ्हे भागातील समस्यांवर कशा प्रकारे तोडगा काढण्यात येईल या विषयावर चर्चा करण्यात आली.
यावेळी खडकवासला विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष काकासाहेब चव्हाण, ग्रामीण राष्ट्रवादी अध्यक्ष त्रिंबक मोकाशी, जिल्हा परिषद उपसभापती शुक्राभाऊ वांजळे, माजी नगरसेवक विकास दांगट पाटील, पंचायत समिती सभापती प्रभावती भूमकर, खडकवासला महिला अध्यक्षा भावना पाटील, नेहा मोरे, यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी भूपेंद्र मोरे म्हणाले, नऱ्हे गाव महापालिकेत समाविष्ट करून बरेच महिने होत आले आहेत, तरी या भागातील नागरी समस्या जैसे थे आहेत. यासाठी आम्ही वेळोवेळी आंदोलने, उपोषण केले तरी प्रश्न सोडविण्यासाठी पालिका ठोस भूमिका घेतना दिसत नाही. त्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत जनसंवाद घडवून आणला यावेळी सुप्रिया सुळे यांनी सोमवारी आयुक्त यांच्यासोबत बैठकीचे आयोजन केले आहे यामध्ये नऱ्हे भागातील पाणी, वीज, ड्रेनेज, रस्ते आदी प्रश्नांवर योग्य तो तोडगा काढला जाईल आणि नागरिकांना दिलासा मिळेल.