ढोल-ताशा पथकांना ‘सुप्रीम’ कोर्टाचा मोठा दिलासा; सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी दिला ‘हा’ आदेश
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/09/mahaenews-34-1-780x470.jpg)
पुणे : पुण्यातील ऐतिहासिक गणेश विसर्जन मिरवणूक म्हंटली तर ढोल-ताशा आलेच. या ढोल ताशांचा आवाज अगदी गगनाला भिडतो. पुण्यात गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान अत्यंत उत्साहाचे वातावरण असते. या वैभवशाली मिरवणुका पाहण्यासाठी देश-विदेशातील पाहुणे पुण्यात येत असतात. पण हरित लवादाच्या एका निर्णयामुळे ढोल-ताशा पथकांच्या उत्साहाला मर्यादा येणार होत्या. मात्र आता सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी एक मोठा निर्णय घेत ढोल-ताशा पथकांना मोठा दिलासा दिला आहे.
राष्ट्रीय हरित लवादाने (पश्चिम झोन) गणेश विसर्जन ढोल-ताशा-झांज पथकांमधील वादकांच्या संख्येला मर्यादा घातली होती. या पथकांमध्ये 30 पेक्षा अधिक सदस्य असणार नाहीत, असे आदेश लवादाने दिले होते. ही जबाबदारी पोलिसांवर सोपवण्यात आली होती. या आदेशाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आणि न्यायाधीश जे. बी. पारदीवाला, मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर गुरूवारी दुपारी सुनावणी पार पडली.
हेही वाचा – आळंदी नगरपरिषद शाळेच्या नवीन इमारत बांधकामास अधिकचा निधी दिला जाईल; उपमुख्यमंत्री अजित पवार
यावेळी न्यायालयाने एनजीटीच्या आदेशाला स्थगिती दिली. त्यामुळे आता ढोल-ताशा पथकांवर किती सदस्य असावेत, याची कोणतीही मर्यादा असणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. ढोल-ताशा पुण्याचे हृदय असल्याचे सांगत सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी त्यांना ढोल-ताशा वाजवू द्या, असे स्पष्ट केले आहे. तसेच उत्सवादरम्यान ध्वनी प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी एनजीटीने जारी केलेल्या इतर निर्देशांना विरोध नसल्याचेदेखील न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
एनजीटीने 30 ऑगस्ट रोजी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने विसर्जन मिरवणुकीदरम्यान रिअल टाईम ध्वनी प्रदुषण मोजावे. उत्सवातील लाऊड स्पीकरच्या मर्यादेबाबतही लवादाने आदेश दिले होते. त्याचप्रमाणे पोलिसांनी ढोल-ताशा-झांज पथकात 30 पेक्षा जास्त सदस्य असणार नाहीत, याची खात्री करावी, अशा सुचना एनजीटीने दिल्या होत्या. या आदेशाचे उल्लंघन झाल्यास पोलिसांनी साहित्य जप्त करावे, असेही आदेशात म्हटले होते. मिरवणुकीत डोल आणि डीजेच्या वापरावरही एनजीटीने निर्बंध आणले आहेत.