लोकन्यायालयात दावा निकाली; अपघाती मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांना मिळाली नुकसान भरपाई
पुणे | अपघातामध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांना वकिलांनी विमा कंपनीकडून 56.45 लाख रुपये नुकसान भरपाई मिळवून दिली. अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळावी यासाठी न्यायालयात दावा दाखल करण्यात आला होता. हा दावा दोन्ही पक्षाच्या वकिलांच्या तडजोडी नंतर लोकन्यायालयात निकाली काढण्यात आला. ॲडव्होकेट मनोहर गंरडे व ॲडव्होकेट श्रीधर येलमार यांनी मृत्यू झालेल्या कुटुंबियांना विमा कंपनीकडून 56 लाख 45 हजार एवढी रक्कम नुकसान भरपाई म्हणून मिळवून दिली.विधी सेवा प्राधिकरण पुणे व पुणे बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने , पुणे जिल्हा मुख्य न्यायाधीश संजय देशमुख तसेच विधी सेवा प्राधिकरण पुणेचे प्रमुख सांवत यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी (दि. 11) पुणे जिल्ह्यातील न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन करण्यात आले.
या राष्ट्रीय लोकअदालतमध्ये दिवाणी, फौजदारी, एन आय ॲक्ट प्रकरणे, बँकेची कर्ज वसुली प्रकरणे, कौटुंबिक वाद प्रकरणे, मोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, तसेच विविध प्रकारची न्यायालयीन प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. त्यापैकी बहुतांश प्रकरणांमध्ये उभय पक्षांमध्ये तडजोडी होऊन प्रकरणे निकाली काढण्यात आली.
त्यापैकी मोटार वाहन अपघात न्यायाधिकरण मधील क्लेम अर्ज उभय पक्षांमध्ये तडजोड होऊन निकाली काढण्यात आला. या प्रकरणातील मयत इसम पादचारी उन्मेष अशोक विभुते यांचे अपघाती निधन झाले होते. त्यामुळे मोटार अपघात न्यायाधिकरणामध्ये मयत उन्मेषची आई शोभा अशोक विभुते यांनी क्लेम अर्ज दाखल केला होता. या प्रकरणामध्ये अर्जदार व आय सी आय सी आय लोंबार्ड इन्शुरन्स कंपनी मध्ये तडजोड होऊन ते प्रकरण रक्कम रूपये 56. 45 रुपयांवर निकाली काढण्यात आले.
याकामी अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश श्री आष्टुरकर, पॅनल जज ॲड. अतुल गुंजाळ व ॲड. दातार यांच्यासमोर हे प्रकरण निकाली काढण्यात आले. याकामी अर्जदारातर्फे ॲड. मनोहर गंरडे व ॲड. श्रीधर येलमार यांनी काम पाहिले, तसेच आय सी आय सी आय इन्शुरन्स कंपनीच्या वतीने ॲड. ऋषिकेश गाणू यांनी काम पाहिले.