ताज्या घडामोडीपुणे

शिवानी अगरवाल यांची कबुली, बदललेले रक्त आपलेच

मुलाला वाचवण्यासाठी कट

पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणातील कारचालक अल्पवयीन मुलाची आई शिवानी अगरवाल यांना शनिवारी (एक जून) गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. ससून रुग्णालयात कारचालकाचा रक्त नमुना बदलण्यासाठी दिलेले रक्त माझेच असल्याची कबुली अल्पवयीन मुलाच्या आईने पोलिसांसमोर दिली. त्यानंतर आईसह वडिलांनाही या गुन्ह्यात अटक केल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिली. शिवानी अगरवाल यांच्या रक्ताची डीएनए चाचणी केली जाणार असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

अल्पवयीन मुलाच्या आईचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत होता. मात्र, त्या पसार झाल्या होत्या. मात्र, शिवानी अगरवाल या घरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर शनिवारी सकाळी साडेसात वाजता गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर दुपारी साडेतीनच्या सुमारास अटकेची कायदेशीर कारवाई केली. येरवडा पोलिस ठाण्यात दाखल अपघाताच्या मूळ गुन्ह्यात त्यांना आरोपी करण्यात आले.

या गुन्ह्यात आतापर्यंत ससून रुग्णालयाचे न्यायवैद्यक विभागाचा प्रमुख डॉ. अजय तावरे, आपत्कालीन विभागाचा वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर, शवविच्छेदन विभागातील शिपाई अतुल घटकांबळे यांना अटक केली आहे. या तिघांनी मुलाच्या रक्ताचे नमुने बदलण्याचे काम केले. अल्पवयीन मुलाची आई आणि त्याचे वडील या दोघांचा या गुन्ह्यात सहभाग आढळून आल्याने त्यांनादेखील याच गुन्ह्यात आता पोलिसांनी अटक केल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

रक्त नमुना बदलण्याचा प्रकार काय?
कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने ससून रुग्णालयात बदलण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला होता. तपासासाठी पोलिसांनी ससून रुग्णालयातील ‘सीसीटीव्ही’त कैद झालेले चित्रीकरण ताब्यात घेतले. त्या वेळी ससून रुग्णालयात रक्त नमुना घेताना संबंधित मुलासह चौघे उपस्थित असल्याचे दिसून आले होते. वैद्यकीय शिक्षण विभागाने नेमलेल्या समितीच्या अहवालात, बदललेले रक्त महिलेचे असल्याचे नमूद केले होते. या पार्श्वभूमीवर शनिवारी शिवानी अगरवालकडे चौकशी केली असता, त्यांनी बदललेले रक्त आपलेच असल्याची कबुली दिल्याचे गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. पोलिसांनी रुग्णालयातील सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेतले. तांत्रिक विश्लेषणात शिवानी अगरवालही ससूनमध्ये उपस्थित असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

तीन गुन्ह्यांत दहा जण अटकेत
कल्याणीनगर अपघात प्रकरणात आतापर्यंत तीन गुन्हे दाखल करण्यात आले असून, यात दहा जणांना अटक करण्यात आली आहे. त्यात अगरवाल कुटुंबातील चौघांचा समावेश आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button