पुण्यात झालेल्या पावसामुळे प्रशासनाचे अपयश अधोरेखित; शिवसेना नेते आदित्य ठाकरे

पुणे | पुण्यात झालेला पाऊस ‘क्लाऊडबर्स्ट’ किंवा ४ तासांत झालेल्या अत्यंत जास्त पर्जन्याच्या श्रेणीतला नव्हता; मात्र ह्या पावसाने प्रशासनाचे अपयश अधोरेखित केले. पाण्याच्या तुंबण्यामागे एखादी अचानक घडलेली घटना कारणीभूत नव्हती. त्यामागचे मूळ कारण म्हणजे, गेल्या अनेक वर्षांपासून सरकार आणि सत्ताधाऱ्यांनी पर्यावरणीय धोक्याच्या चिन्हांकडे केलेले सातत्यपूर्ण दुर्लक्ष आहे, अशी टीका शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
मागील ४ वर्षांपासून पर्यावरण तज्ज्ञ, शहरी नियोजक, अभियंते, नागरीक सातत्याने विनाशाकडे नेणाऱ्या प्रकल्पांविरोधात आवाज उठवत आहेत आणि उपायही सुचवत आहेत. अशा अव्यवहार्य प्रकल्पांमध्ये,
- रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट
- चुकीच्या ठिकाणी उभारलेले मेट्रो खांब
- नदीपात्रातील अतिक्रमणे
- नदीच्या रेड आणि ब्लू फ्लड लाईन्समध्ये केलेले बदल
- वेताळ टेकडीच्या नाशाचा प्रस्ताव
हे सर्व मुद्दे वारंवार मांडण्यात आले आहेत.
हेही वाचा : पक्षांतर्गत शीतयुद्ध: पुणे-पिंपरी-चिंचवड शिवसेनेत ‘सर्जिकल स्ट्राइक’?
पुन्हा एकदा स्पष्ट करतो, फक्त काँक्रीट ओतणे म्हणजे विकास नाही. गेल्या दशकभरापासून पुण्यात ‘ट्रिपल इंजिन सरकार’ असूनही, हा कथित विकास प्रत्यक्षात संकटच ठरत आहे. जर हा तथाकथित विकास असाच सुरू राहिला, तर पुण्याला अशा परिस्थितींना अनेकदा सामोरे जावे लागेल आणि ‘विकास’ नावाखाली केवळ मृगजळ दाखवले जाईल. २०२१ मध्ये पर्यावरण मंत्री म्हणून, मी रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट प्रोजेक्ट थांबवून तो पुण्याच्या गरजेनुसार पुन्हा आखण्याचे निर्देश दिले होते.
- नदीच्या नैसर्गिक व मूळ रेड- ब्लू फ्लड लाईन्स पुन्हा निश्चित करणे अत्यावश्यक आहे.
- सलीम अली पक्षी उद्यान पुनर्जीवित केले होते, जे आज पुन्हा ढिगाऱ्यांनी भरले जात आहे.
- वेताळ टेकडी आणि इतर मोकळ्या जागांचे संवर्धन अत्यंत गरजेचे आहे.
निर्णय आता आपल्या हातात आहे आणि त्याच्या परिणामाची झलक काल पुणेकरांनी प्रत्यक्ष अनुभवली आहे, असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.





