#PuneMNS; मनसेतील राजीनाम्याचं सत्र सुरूच; आणखी २ पदाधिकाऱ्यांनी पक्ष सोडला!
![#PuneMNS; MNS resignation session continues; 2 more office bearers leave the party!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/04/MNS-resignation.jpg)
पुणे | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मुस्लीम समाजाबद्दल केलेल्या वकव्यानंतर पक्षातील कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत. मनसेचे पुण्यातील नगरसेवक वसंत मोरे यांनी राज ठाकरेंच्या भूमिकेला जाहीर विरोध केल्याने मोरे यांना शहराध्यक्षपदावरून दूर करण्यात आलं. त्यामुळे आधीच राज ठाकरे यांच्या वक्तव्याने दुखावलेल्या मनसेतील मुस्लीम कार्यकर्त्यांच्या नाराजीत भर पडली असून आणखी दोन पदाधिकाऱ्यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.
मनसेचे शहर उपाध्यक्ष अझरुद्दीन सय्यद यांनी आपल्या पदासह पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा मनसेचे नवनियुक्त शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्याकडे पाठवला आहे. ‘मी अतिशय दु:खी आणि निराश मनाने पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या पक्षाला सर्वस्व मानून काम करत होतो, त्या पक्षाच्या अध्यक्षांनीच मुस्लीम समाजाबद्दल चुकीची भूमिका घेऊन पक्ष सोडण्यास प्रवृत्त केलं आहे, त्यांचे आभार,’ असं सय्यद यांनी आपल्या राजीनाम्यात म्हटलं आहे. दुसरीकडे पुण्यातील मनसेच्या आणखी एका उपविभाग अध्यक्षानेही राजीनामा दिला आहे.
पुण्यात आतापर्यंत ४ पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात आक्रमक हिंदुत्वाचा पुरस्कार करत मशिदीवरील भोंगे हटवले नाहीत तर तिथंच दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले. तसंच मुंबई परिसरातील मदरशांमध्ये धाडी टाका, म्हणजे त्यात काय-काय मिळेल हे तुमच्या लक्षात येईल, असं राज यांनी म्हटलं. पक्षाच्या अध्यक्षांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे मनसेतील मुस्लीम पदाधिकारी दुखावले गेले आणि त्यांनी पक्षापासून दूर होण्याचा निर्णय घेतला. पुण्यातून सर्वात आधी मनसेचे शाखाध्यक्ष माजिद शेख आणि वाहतूक सेनेचे उपाध्यक्ष शहाबाज पंजाबी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. हे राजीनामा सत्र अजूनही सुरू असून आणखी दोन पदाधिकाऱ्यांना राजीनामा दिल्याने शहरात मनसेची डोकेदुखी वाढली आहे.
दरम्यान, गुढीपाडवा मेळाव्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेला संभ्रम आणि विरोधकांकडून केलेल्या जाणाऱ्या टीकेच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे १२ एप्रिल रोजी ठाण्यात जाहीर सभा घेणार आहेत. या सभेच्या माध्यमातून ते टीकाकारांना प्रत्युत्तर देतील, असं मनसेच्या नेत्यांकडून सांगण्यात आलं आहे.