गणेश विसर्जन मिरवणुकीमुळे पुण्याच्या मेट्रोचं काम थांबलं, पण का? वाचा इथे
![Pune Metro work stopped due to Ganesh Immersion procession, but why? Read here](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/12/Pune-Metro-Trial-1.jpg)
पुणे | वनाज ते रामवाडी या मार्गावर धावणाऱ्या मेट्रोचं छत्रपती संभाजी फुलावरील काम गेल्या अनेक महिन्यांपासून बंद आहे. छत्रपती संभाजी पूलावरील मेट्रोच्या खांबामुळे गणेश विसर्जन मिरवणुकीतील देखाव्यांना अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या खांबांची उंची वाढवण्यात यावी अशी मागणी गणेश मंडळांनी केली आहे.मात्र या मागणीमुळे मेट्रोच्या कामाचा खर्च तब्बल 70 कोटी रुपयांनी वाढणार आहे. याकरिता जास्तीचे जवळपास 39 खांब उभी करावी लागणार आहेत. त्यामुळे महा मेट्रोचा प्रकल्प पूर्ण होण्याचा कालावधी आणखी दोन वर्षांनी वाढणार असल्याचे मेट्रो प्रशासनाचे म्हणणे आहे.
मागील गणेश विसर्जन मिरवणुकीनंतर हा वाद निर्माण झाला होता. तेव्हापासून मेट्रोचं या पुलावरील काम बंद आहे. मध्यंतरी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मध्यस्थी करून हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यात यश आले नाही. मंगळवारी पुढे महानगरपालिकेत झालेल्या सर्वसाधारण सभेत याच विषयावरून पुन्हा सत्ताधारी आणि विरोधकात वादावादी झाली.
काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि मनसे यांनी गणेश मंडळांची बाजू घेत सभागृहात गोंधळ घातला. हा वाद इतका विकोपाला गेला की शिवीगाळ करण्यात आली आणि या गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज गुरुवारपर्यंत तहकूब करण्यात आले.
त्यानंतर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषद घेत याची सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या अजित पवार यांनी पोलिसांच्या देखरेखीत मेट्रोचं काम सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. महामेट्रोन पुणे महानगरपालिकेला दिलेल्या पत्रात याचा स्पष्ट उल्लेख केला आहे.
एकीकडे उपमुख्यमंत्री मेट्रोचं काम सुरू करण्याचे आदेश देतात आणि दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचे पदाधिकारी महापालिका सभागृहात गोंधळ घालतात असा आरोप मुरलीधर मोहोळ यांनी केला आहे.