‘महाराष्ट्र राज्य अग्नीप्रतिबंधक दला’ची स्थापना करण्यात यावी; खासदार सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी
![‘Maharashtra State Fire Brigade’ should be established; MP Supriya Sule made a demand to the Chief Minister](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/5BMSUPRIYASULE.jpg)
पुणे – पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील पिरंगुट येथील औद्योगिक वसाहतीमधील एसव्हीएस या कंपनीला लागलेल्या आगीत 18 कामगारांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची मदत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केली. गेल्या काही दिवसात राज्यातील आगीच्या घटना वाढल्या आहेत, या पार्श्वभूमीवर ‘महाराष्ट्र राज्य अग्नीप्रतिबंधक दला’ची स्थापना करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रात घडलेल्या जळीतप्रकरणांत अनेक जणांचा बळी गेला.सोमवारी उरवडे,ता.मुळशी येथेही एका फॅक्टरीला आग लागून मोठी जिवितहानी झाली.या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा ‘महाराष्ट्र राज्य अग्नीप्रतिबंधक दला’ची आवश्यकता भासत असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
राज्यात सध्या अस्तित्वात असलेल्या कायद्यानुसार शहरी व निमशहरी भागांमध्ये अग्नीशमन यंत्रणा अस्तित्वात आहे.परंतु जिल्हा परिषद व ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात ही यंत्रणा पुरेशा क्षमतेने कार्यरत नाही. परिणामी अशाप्रकारच्या घटना घडल्यानंतर जिवितहानी होण्याची शक्यता अधिक वाढते, असे त्या म्हणाल्या.
गेल्या २६ एप्रिल रोजी मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे यांना एक पत्र लिहून या त्रुटी दूर करण्यासंदर्भात तरतूदी असणारे ‘महाराष्ट्र राज्य अग्नीप्रतिबंधक दल’ स्थापन करण्याची मागणी केली होती. राज्यात सध्या कोरोनाची स्थिती असून सर्वच व्यवस्थांवर ताण पडत असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
उरवडे सारख्या घटना पुन्हा घडू नयेत व नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे यासाठी आपण सर्वांनी मिळून काम करण्याची गरज आहे. या मागणीबाबत सकारात्मक विचार करुन निर्णय घ्यावा, अशी विनंती सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.