विधानसभा निवडणुकीतील पैशावर ‘नजर’
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/10/mahaenews-1-780x470.jpg)
पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. निवडणुकीच्या काळात अनेक उमेदवारांकडून पैशाचा गैरवापर होत असल्याचे प्रकार उघडकीस येतात. या पार्श्वभूमीवर प्राप्तिकर विभागाच्या पुणे कार्यालयाने पैशाचा गैरवापर रोखण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारांकडून पैशाचा गैरवापर होऊ नये, यासाठी प्राप्तिकर विभागाने पावले उचलली आहेत. निवडणूक मुक्त आणि योग्य पद्धतीने व्हाव्यात यासाठी प्राप्तिकर विभागाने मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत प्राप्तिकर विभागाने नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. या कक्षाच्या माध्यमातून निवडणुकीतील पैशाच्या गैरवापरावर लक्ष ठेवले जात आहे. याचबरोबर निवडणुकीतील गैरप्रकारांच्या तक्रारी नागरिकांना करता याव्यात यासाठी टोल फ्री दूरध्वनी क्रमांक १८००२३३०३५३ व १८००२३३०३५४ सुरू करण्यात आले आहेत.
हेही वाचा – ‘हॉलो, लॉरेन्स भाई..’; सलमान खानच्या Ex गर्लफ्रेंडचा लॉरेन्स बिश्नोईला खास मेसेज
याचबरोबर नागरिक मोबाईल क्रमांक ९४२१५४६४८४ वर संदेश, व्हिडीओ आणि छायाचित्रे व्हॉट्सअॅपवर पाठवून तक्रार करू शकतात. प्राप्तिकर विभागाच्या पुणे कार्यालयाच्या अंतर्गत पुण्यासह पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, अहिल्यादेवीनगर, सोलापूर, सातारा, सांगली, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या जिल्ह्यांतील नागरिक तक्रार करू शकतात. नागरी ई-मेल अथवा पत्र पाठवूनही तक्रार नोंदवू शकतात, अशी माहिती प्राप्तिकर विभागाने दिली.
दरम्यान, महाराष्ट्र व झारखंड या दोन्ही राज्यांतील विधानसभा निवडणुकांची घोषणा १६ ऑक्टोबरला केंद्रीय निवडणूक आयोगाने केली. राज्यात २८८ जागांसाठी एकाच टप्प्यामध्ये २० नोव्हेंबर रोजी मतदान होईल. झारखंडमध्ये दोन टप्प्यांत १३ व २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. दोन्ही राज्यांत २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी केली जाईल. विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यामुळे दोन्ही राज्यांमध्ये आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.