धक्कादायक! पुण्यात हॉटेल चालकाने उकळतं पाणी टाकून केला दोन भिकाऱ्यांचा खून; आमदाराने आरोपीला वाचवलं?
पुणे : पुण्यातील सासवड परिसरात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. हॉटेल चालकाने तीन भिकाऱ्यांवर उकळतं पाणी टाकल्याचा प्रकार उघड झाला आहे. या घटनेत गंभीररित्या भाजलेल्या दोघांचा मृत्यू झाला असून एक भिक्षेकरी महिला जखमी झाली आहे. पप्पू उर्फ निलेश जयवंत जगताप असं या नराधम हॉटेल चालकाचं नाव आहे. ही घटना २३ मे रोजी सासवड येथे घडली. मात्र हा प्रकार आता १० दिवसांनंतर उजेडात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तीन भिक्षेकरी पप्पू जगताप याच्या हॉटेलजवळ असलेल्या अहिल्यादेवी मार्केट येथील ओसरीवर दररोज बसत होते. याचाच राग मनात धरून पप्पू जगताप याने या तिघांना सर्वप्रथम काठीने मारहाण केली. मारहाणीत निपचीत पडलेल्या भिकाऱ्यांचा अजून मृत्यू कसा झाला नाही, असं नराधम पप्पू जगताप याला वाटलं. त्यामुळे त्याने हॉटेलमधील गरम पाणी या तिन्ही भिक्षेकरीच्या अंगावर ओतलं. यात तिन्ही भिक्षेकरी पूर्णपणे भाजून निघाले. त्यातील दोघांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला.
ज्या ठिकाणी हे हत्याकांड झालं तिथून सासवड पोलीस स्टेशन अगदी हाकेच्या अंतरावर आहे. मात्र पोलिसांनी या घटनेकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. या हत्याकांडातील आरोपी पप्पू उर्फ निलेश जयवंत जगताप हा स्थानिक आमदाराचा नातेवाईक असल्याचीही प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे या प्रकरणात कारवाई होऊ नये म्हणून राजकीय हस्तक्षेप झाला का, असाही प्रश्न विचारण्यात येत आहे.