कॉपी आढळल्यास परीक्षा केंद्र कायमची रद्द
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2025/01/Dr.-Neelam-Gorhe-1-12-780x470.jpg)
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी, बारावीच्या परीक्षांमध्ये कॉपी सारख्या गैरमार्गाची प्रकरणे आढळून आल्यास संबंधीत परीक्षा केंद्रांची मान्यता पुढील वर्षीपासून कायमची रद्द करण्यात येणार आहे. याबरोबरच परीक्षा केंद्रावरील शिक्षक, केंद्रसंचालक, पर्यवेक्षक यांची अदलाबदल करण्याच्या निर्णयात अंशतः बदल करण्यात आला आहे.
बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च व दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च या कालावधीत होणार आहे. करोना काळातील २०२१ व २०२२ या दोन परीक्षा वगळून मागील ५ वर्षाच्या म्हणजेच फेब्रुवारी-मार्च २०१८, २०१९, २०२०, २०२३ व २०२४ या परीक्षांमध्ये ज्या परीक्षा केंद्रांवर गैरमार्गाची प्रकरणे आढळून आली आहेत, अशा परीक्षा केंद्रावर केंद्रसंचालक, पर्यवेक्षक व परीक्षेशी संबंधित व्यक्तींची नियुक्ती करताना अदलाबदल करण्यात येणार आहे.
हेही वाचा : क्रांतिवीर चापेकर स्मारकाच्या उभारणीस वेग येणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
गैरमार्गांची प्रकरणे न आढळलेल्या परीक्षा केंद्रावर त्याच ठिकाणच्या शिक्षक, केंद्रसंचालक,पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे, असे आदेश राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी जारी केले आहे.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा दक्षता समिती अध्यक्ष यांना त्यांच्या जिल्ह्यात परीक्षा पारदर्शकपणे होण्यासाठी आवश्यकते प्रमाणे नियोजन करण्याची मुभा राहील. शिक्षणाधिकारी (माध्यमिक), सदस्य सचिव दक्षता समिती, विभागीय मंडळे यांनी जिल्हाधिकारी यांच्या सहकार्याने परीक्षा कालावधीत प्रत्येक परीक्षा केंद्रावर पूर्णवेळ बैठे पथक कार्यरत राहील याची खबरदारी बाळगावी लागणार आहे.