‘ओला दुष्काळ’ जाहीर करा; ‘ऑनलाइन ट्रेंड’ला मोठा प्रतिसाद
पुणे : ओल्या दुष्काळाच्या प्रश्नावर पक्ष, झेंडे यांच्या पलीकडे जाऊन राज्यातील शेतकऱ्यांच्या मुलांनी गुरुवारी ‘ऑनलाइन ट्रेंड’ चालवला. त्याला तरुण शेतकरी, पत्रकार, बुद्धिजीवी, विचारवंत, मध्यमवर्गीयांनी मोठा प्रतिसाद दिला.
राज्य आणि केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अन्यथा रस्त्यावर उतरून संघर्ष करावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. दरम्यान, किसान सभेचे राज्य अधिवेशन ३१ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबपर्यंत अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात होत आहे. केंद्र तसेच राज्याचे नेतृत्व आणि राज्यभरातील निवडलेले ३०० प्रतिनिधी या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत. अधिवेशनाच्या सुरुवातीला शेतकऱ्यांची जाहीर सभा पार पडणार आहे. शेतकऱ्यांच्या मुलांनी सुरू केलेल्या ‘ऑनलाइन ट्रेंड’ची राज्य आणि केंद्र सरकारने योग्य दखल घेतली नाही, तर या अधिवेशनात विचार-विनिमय करून राज्यात आंदोलन केले जाईल, असा इशारा किसान सभेने दिला आहे.