अमोल मिटकरीचं वादग्रस्त भाषण, काँग्रेसही आक्रमक, तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी
पुणे | राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांच्या इस्मामपुरातील सभेने राज्याचं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. त्यांच्या घणाघाती भाषणावर राजकीय नेते विविध प्रतिक्रिया देत आहेत. यावर आता काँग्रेसच्या नेत्या संगीता तिवारी यांनी पुणे कोरेगाव पोलीस स्टेशनला पत्र पाठवून मिटकरींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
पत्रात म्हटले आहे की, ‘अमोल मिटकरी यांनी ‘मम् भार्या समर्पयामि’ असा एक मंत्र सांगितला. परंतु साहेब असा कोणताही मंत्र हिंदूच्या कोणत्याही विधीत नाही. मिटकरी यांनी धांदात खोटे बोलून खोटे सांगून हिंदू धर्माची जाहीर बदनामी केली आहे. आणि आमच्या समाजाची टिंगल केली आहे. त्यांच्यावर त्वरीत कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मी आपणास विनंती करते’.
अमोल मिटकरी नेमकं काय म्हणाले होते?
इस्लामपूरच्या सभेत हनुमान चालिसा मुद्द्यावर बोलताना अमोल मिटकरी मध्येच काही मंत्र म्हणाले. विधी करणारे ब्राह्मण (गुरुजी) सांगतात त्याप्रमाणे त्यांनी डोळ्याला पाणी लावा, असं विशिष्ट स्टाईलमध्ये सांगितलं. मिटकरींच्या हुबेहूब मिमिक्रीने मंचावर बसलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि धनंजय मुंडे पोट धरुन हसायला लागले.
मम भार्या समर्पयामि, ब्राम्हण समाजाच्या वक्तव्यावर मिटकरींचं स्पष्टीकरण
अमोल मिटकरी यांच्या वक्तव्यावरून राज्यात राण पेटलं. यावर आता स्वत: आमदार अमोल मिटकरी यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.ज्यांना वाटतं मी माफी मागावी त्यांनी अगोदर जिजाऊंची माफी मागावी. मगच मी माफी मागायला तयार आहे. असं अमोल मिटकरी यांनी स्पष्ट केलं.