चासकमान धरणावर एकूण ३२ विद्यार्थी गेले, परतले फक्त २८, चौघांचा बुडून मृत्यू
पुणे: खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील चासकमान धरणामध्ये सह्याद्री स्कुलच्या दहावीत शिकत असलेल्या चार विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी(19) रोजी सायंकाळीच्या सुमारास घडली. यामध्ये दोन मुले व दोन मुलींचा समावेश होता. या घटनेने खेड तालुक्यात खळबळ उडाली. ‘आम्हाला आमची मुलं जिवंत द्या’, असा टाहो नातेवाईकांनी शाळा प्रशासनापुढे फोडला.
सह्याद्री स्कुलमध्ये ही मुलं निवासी राहून शिक्षण घेत असल्याने शिक्षकांनी पालकांची परवानगी न घेता मुलांना धरणावर नेले. या घटनेस शाळा प्रशासन जबाबदार आहे, त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, असा आक्रमक पवित्रा नातेवाईकांनी घेतला आहे. या घटनेचा सखोल तपास केला जाईल, असे आश्वासन पोलीस निरीक्षक सतीश गुरव यांनी नातेवाईकांना दिले आहे. मृतांमध्ये परीक्षित कुलदिप अग्रवाल ( वय १६), नव्या प्रज्ञेश भोसले (वय १६), रितीन डी. धनशेखर ( वय १६), तनिषा हर्षद देसाई (वय १६) यांचा समावेश आहे. परीक्षितच्या मागे आई, वडील व भाऊ मतिमंद आहे. रीतीन हा आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. तनिषाच्या मागे आई, वडील व मोठी बहीण आहे.
याबाबत विनायक अशोक शर्मा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सह्याद्री स्कुल, के. एफ. आय हे रेसीडेन्शीयल स्कुल असल्याने येथे ४६ शिक्षक रहायला आहेत. या शाळेमध्ये मध्ये एकुण २८० विद्यार्थी राहण्यास आहेत. १९ मे रोजी सकाळी ११ ते १२:३० वाजेपर्यंत १० वीच्या विद्यार्थ्यांचा शेवटचा पेपर होता. पेपर संपल्यानंतर विद्यार्थ्यांनी जेवणानंतर, मी आणि इतर शिक्षक श्रीनिधी माहेशी, ओमना संतोष, जॉन्सी थॉमस असे आम्हाला मुले म्हणाली की, ‘आज आमचा शेवटचा पेपर झाला असुन आम्ही एकमेकांचा निरोप घेतला आहे आणि आम्ही आपआपल्या घरी जाणार असल्याने आपण स्कुलच्या टेकडीच्या खाली पाण्यात खेळायला जावू’, अशी विनंती आम्हाला केली. साडे चार वाजताच्या सुमारास तीन शिक्षक आणि एकूण ३२ विद्यार्थी चासकमान धरणाच्या पाण्याचा फुगवटा असलेल्या पाण्यात गेलो होतो.
‘पाण्यामध्ये अंदाजे अर्धा तास विद्यार्थ्यांचे खेळुन झाल्यानंतर अचानक पणे जोराचे वादळ येवून पाण्याच्या जोराच्या लाटा तयार झाल्याने ३२ विदयार्थी आणि आम्ही शिक्षक असा आमचा ग्रुप पुर्णपणे पाण्यात ओढला गेला. त्यांनतर आम्ही शिक्षकांनी प्रयत्न करून एकमेकांच्या हाताला धरून विद्यार्थांना बाहेर काढले. मात्र, ३२ पैकी फक्त २८ विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यत यश आले. मात्र, चार विद्यार्थी सापडले नाहीत. आम्ही गावातील लोकांच्या मदतीने पाण्यात बेपत्ता झालेल्या मुलांचा शोध घेतला. सायंकाळी ५ च्या सुमारास एका पाठोपाठ एक असे एकुण ४ विद्यार्थी पाण्यात आढळून आले. आम्ही त्यांना पाण्याच्या बाहेर काढले. त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता’, अशी माहिती शिक्षकाने दिली.