५-१० हजार उसने मागणारे कोट्यधीश कसे झाले? चंद्रकातदादांना राजू शेट्टींचा सवाल
कोल्हापूर – लोकांकडे ५-१० हजार रुपये उसने मागणारा माणूस आज दारात आलेल्या प्रत्येकाला किती पैसे पाहिजेत, असा प्रश्न विचारतो. एवढी सिद्धी आली कुठून, असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना केला.
राजू शेट्टी साखर कारखानदारांशी सेटलमेंट करतात, असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला होता. त्याचा शेट्टी यांनी चांगलाच समाचार घेतला. राज्यातील बहुतेक साखर कारखानदार भाजपच्या वळचणीला गेले आहेत.मी पैसे घेतलेल्या त्यातील कोणत्याही कारखानदाराला बिंदू चौकात घेऊन या, नाहीतर कोणत्या इंजिनिअरकडून आणि कंत्राटदाराकडून किती पैसे घेतलेत त्यांना मी बिंदू चौकात घेऊन येतो, असे आव्हान शेट्टी यांनी दिले.
भाजपने घराणेशाहीचा आरोप दुसऱ्यावर करू नये. पूनम महाजन, संतोष दानवे, रक्षा खडसे असे घराणेशाहीतले अनेक उमेदवार भाजपने दिले आणि खासदारांची संख्या २ वरून २८३ वर नेणाऱ्या अडवाणी – जोशी यांना उमेदवारी नाकारली, अशी टीकाही त्यांनी केली. घराणेशाहीवर बोलण्याचा अधिकार फक्त आम्हाला आहे, कारण आम्ही त्या भानगडीत पडत नाही, असेही ते म्हणाले.
मोदींच्या आज वर्ध्यात झालेल्या सभेला झालेली गर्दी पाहून भविष्यात काय होणार आहे, हे स्पष्ट झाले आहे.सभेत अर्ध्याहुन अधिक खुर्च्या रिकाम्या होत्या. आमच्या आघाडीच्याच जागा जास्त येतील, असा दावाही त्यांनी शेवटी केला.