सांगलीत दादा घराण्याला नाराज करुन आम्हाला जागा नको – खासदार राजू शेट्टी
सांगली – सांगलीची जागा मतभेद असतील तर आम्हाला नको, असे खासदार राजू शेट्टी यांनी आज (सोमवारी) स्पष्ट केले. त्यामुळे ही जागा काँग्रेसकडेच जाईल आणि स्वाभिमानी ही जागा सोडेल, असेही संकेत त्यांनी देवून आम्ही वर्धा किंवा शिर्डी घेण्यास तयार आहोत, अशी मागणी शेट्टी यांनी केली.
शेट्टी यांनी घेतलेल्या पत्रकार परिषद घेत त्यांनी काँग्रेसला इशारा दिला. उद्यापर्यंत निर्णय घेण्यास त्यांनी सांगितले. तसेच शेट्टी म्हणाले, आम्ही माघार घेणार नाही. भाजप सरकारला घालवण्यासाठी एकाकी पद्धतीने लढायलाही तयार आहोत. सांगलीची जागा आम्हाला द्यायची असेल तर सगळे वाद संपवून आम्हाला द्यावी. एक मत होऊन निवडणूक लढवायची आहे. कारण आम्हाला भाजपला हरवायचे आहे..एकमत करा अन्यथा शिर्डी द्या, अशीही मागणी त्यांनी केली.
शेट्टी म्हणाले, महाआघाडी निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी यासाठी ही महाआघाडी आहे. आम्ही सहा जागा मागितल्या होत्या. पण सहा आम्हाला मिळणार नाहीत, हे माहीत होते. आता मागणी आमची तीन जागांची होती. हातकणंगले, बुलढाणा, वर्धा या तीन जागा हव्या होत्या. शिर्डी घ्यायची तयारी दाखवली पण निर्णय लवकर होत नव्हता. काँग्रेस – राष्ट्रवादी या दोघांच्या कोट्यातून जागा द्यायच्या होत्या. सांगलीबद्दल आम्ही जास्त इच्छुक नाही. पण सांगली ही जवळ आहे म्हणून मागितले होती, असेही शेट्टी यांनी स्पष्ट केले.
शेट्टी म्हणाले, स्वाभिमानीने वसंतदादा घराण्यावर अन्याय केला. असे दर्शवले जात आहे. तसे काहीही नाही. आम्ही वर्धा किंवा शिर्डी घेण्यास तयार आहोत. विनाकारण स्वाभिमानीला पिंजऱ्यात उभे केले जात आहे. वसंतदादा यांनी शेतकऱ्यांच्या विषयी जे योगदान दिले त्याची आम्हाला जाणीव आहे.
स्वाभिमानीकडे सक्षम उमेदवार नाही असे चित्र रंगवले जात आहे. पण दोन ते तीन उमेदवार स्वाभिमानीकडे आहेत, असेही श्री. शेट्टी यांनी स्पष्ट केले.