वाटलं इमारतच कोसळली, कोंढवा दुर्घटनेतून वाचलेल्या मजुराचा अनुभव
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/06/Screenshot.jpg)
पुण्यातल्या कोंढवा या भागात इमारत कोसळून १५ जणांचा मृत्यू झाला. या घटनेतून बचावलेल्या एकाने त्याचा अनुभव सांगितला विमल शर्मा असं या मजुराचं नाव आहे. त्याने सांगितलेला अनुभव अंगावर काटा आणणारा आहे. विमल शर्माने सांगितले, आम्ही सगळे रात्री झोपेत होतो तेव्हा एक मोठा आवाज झाला. एका क्षणासाठी असं वाटलं की भली मोठी इमारतच कोसळली की काय? मात्र थोड्याच वेळात लक्षात आलं की भिंत कोसळली.
मी इथे परवाच आलो होतो. या दुर्घटनेत माझ्या सख्ख्या भावाचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत १८ लोक भिंतीच्या ढिगाऱ्याखाली दबले. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास मला आवाज आला मला वाटले की बिल्डिंगच पडली. लोक वाचवा वाचवा असे ओरडत होते. माझ्या गावातले काही लोक शेजारच्या झोपडीत रहात होते त्यांनी मला भिंत कोसळल्याचे सांगितले. आम्हाला पत्र्याची शेड उभारून दिली. मी पुण्यात येऊन जाऊन मजुरीची कामं करतो. मात्र अशी घटना मी कधी पाहिली नव्हती. गावात शेतीच्या कामांसाठी मी गेलो होतो परवाच पुण्यात परतलो आणि काल रात्री ही घटना घडली असे विमलने सांगितले. दुर्घटनेत माझा भाऊ गेला हे सांगताना त्याला अश्रू अनावर झाले.
पुण्यातल्या कोंढवा भागात रात्री दीडच्या सुमारास इमारतीची संरक्षक भिंत मजुरांच्या तात्पुरत्या झोपड्यांवर कोसळली. हा आघात इतका प्रचंड होता की पार्किंग लॉटमध्ये उभ्या असलेल्या काही गाड्याही या ठिकाणी लटकू लागल्या. या ठिकाणी रात्री १ वाजून ५० मिनिटांपासून मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाचे जवान ढिगारा उपसण्याचे काम करत आहेत. आत्तापर्यंत तिघांना जिवंत बाहेर काढण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलं आहे. या दुर्घटनेतून विमल शर्मा हा वाचला आहे. त्याने सांगितलेला अनुभव अंगावर काटा आणणारा आहे. या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करा अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोंढवा दुर्घटनेप्रकरणी सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.