मुख्यमंत्र्यांनी वाढदिवशी मराठा समाजासोबत असल्याचा विश्वास द्यावा, आशीर्वाद मिळेल : विनायक मेटे
पुणे | “राज्यात तीन मुख्यमंत्री आहेत. उद्धव ठाकरे नावाला मुख्यमंत्री, मंत्रालयातून काम करणारे अजित पवार हे दुसरे मुख्यमंत्री, तर शरद पवार हे सुप्रीम मुख्यमंत्री आहेत” अशी टीका ‘शिवसंग्राम’चे अध्यक्ष विनायक मेटे यांनी केली. मराठा आरक्षणविषयी त्यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. “मुख्यमंत्र्यांनी आपल्या वाढदिवशी, आपण मराठा समाजासोबत आहोत हा विश्वास द्यावा, मराठा समाज त्यांना आशीर्वाद देईल” असेही मेटे म्हणाले.
“मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून शिवसंग्राम आणि इतर संघटना प्रयत्न करत आहेत. देवेंद्र फडणवीस सरकार असताना हे आरक्षण टिकवण्याचे प्रयत्न केले. मात्र, काही लोक समाजात दुही माजवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात गेले” असे मेटे म्हणाले.
“या सुनावणीचा परिणाम राज्यातील कोट्यवधी लोकांवर होणार आहे. ही सुनावणी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होता कामा नये, ही आमची सुरुवातीपासून मागणी आहे. कारण या निकालाचा परिणाम हा दूरगामी असणार आहे” असेही विनायक मेटे म्हणाले.
“आरक्षण हा घटनात्मक विषय असल्याने तो घटनापीठाकडे सोपवणं आवश्यक आहे. यावरही आज बाजू मांडण्यात येईल. सरकारनेही व्हिडीओ कॉन्फरन्सवर सुनावणी नको, यावर ठाम राहावं. यात राजकारण आणता कामा नये” अशी अपेक्षा मेटेंनी व्यक्त केली.