मुंबईसह पुण्यातही पावसाच्या सरी कोसळल्यात
राज्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असून ठिकठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबई, कोल्हापूर सारख्या ठिकाणांना हायअलर्टचा इशारा देण्यात आलाय. त्याचसोबत पंचगंगा नदीने पाण्याची पातळी ओलांडली असून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात यावं अशा सुचना दिल्या आहेत. याच दरम्यान आता पुण्यात आज पावसाच्या हलक्या सरी कोसळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. त्याचसोबत ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आयएमडी यांनी व्यक्त केली आहे.
पुणे शहराला टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला धरणातून पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. तर जुलै महिन्यापर्यंत या धरणांमध्ये पुरेसा पाणी साठा झालेला नव्हता. परंतु गेल्या 24 तासात झालेल्या मुसळधार पावसाने हजेरी लावल्याचे दिसून आले. त्यामुळे खडकवासला धरणात समाधानकारक वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
मुंबईसह उपनगरात सध्या पावसाची संततधार सुरुच आहे. त्यामुळे आयएमडी यांच्याकडून आजच्या दिवसासाठी किनारपट्टी भागाला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्याचसोबत अतिमुसळधार पावसासह वेगाने वारे वाहत असल्याने मोठी झाडे सुद्धा उन्मळून पडलेली रस्त्यांवर दिसून येत आहेत. यामुळे आता महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून या संदर्भातील काम करण्यात येत आहे. तसेच काही ठिकाणी वाहतूक सुद्धा वळवण्यात आलीये.