मराठा क्रांती मोर्चा उतरणार रस्त्यावर, निर्णय विरोधात गेल्यास सरकारविरोधात आंदोलन
पुणे | महाईन्यूज | प्रतिनिधी
मराठा क्रांती मोर्च्याने पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. सारथी संस्था आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारला इशारा दिला आहे. ‘उद्या मराठा आरक्षणाची सुनावणी आहे. निकाल विरोधात गेला तर 9 ऑगस्टपासून मराठा क्रांती मोर्चा कोरोना लॉकडाऊनचे निर्बंध पाळून रस्त्यावर उतरेल,’ असा इशारा पुण्यात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेतून क्रांती मोर्चाने दिला आहे.
‘राज्यातील 3 पक्षाच्या सर्कसमुळे मराठा समाजावर अन्याय व्हायची भीती आहे. ‘सारथी’बाबत एक समिती नेमली. त्यानंतर अहवाल आला. परत दुसरी समिती नेमली. मात्र हा अहवाला समोर मांडला जात नाही. मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडून या खात्याचा कारभार काढून घ्यावा,’ अशी मागणीही या पत्रकार परिषदेतून करण्यात आली आहे.
‘सारथीच्या प्रश्नावरून आंदोलन झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना पाठवलं होतं. तेव्हा 15 दिवसांत प्रश्न मार्गी लावतो, असं सांगण्यात आलं मात्र 6 महिने उलटल्यानंतरही परिस्थिती जैसे थे आहे. जर आरक्षणाबाबत दगा फटका झाला तर मराठा समाज आक्रोश करेल,’ असा इशारा यावेळी देण्यात आला.
भाजपच्या टोळक्यांनी चिंता करू नये, सरकार खंबीर
‘सारथीची स्वायत्तता कुठेही संपलेली नाही. सारथीचं काम उत्तमपणे सुरू आहे. पत्रकार परिषद घेणारी भाजपचीच टोळकी आहेत,’ अशा आक्रमक शब्दांमध्ये विजय वडेट्टीवार यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. तसंच या प्रकरणाला राजकीय रंग देऊ नये. आम्ही समाजाचे प्रतिनिधी म्हणून आलो आहोत, असंही आवाहन वडेट्टीवार यांनी केलं आहे.