भुशी धरणाकडे जाण्यास सायंकाळी पाचनंतर वाहनांना ‘नो एन्ट्री’
लोणावळा – भुशी धरणाकडे जाणार्या रस्त्यावर सायंकाळी पाचनंतर वाहनांसाठी प्रवेशबंदी करण्याचा निर्णय पोलिसांकडून जाहीर करण्यात आला. लोणावळा उपविभागीय पोलिस अधिकारी डी. डी. शिवथरे यांनी ही माहिती दिली.
तसेच सुरक्षेच्या दृष्टीने सायंकाळी पाच वाजता पर्यटकांना भुशी धरणावरून बाहेर काढायला सुरुवात करून सहा वाजता धरण पूर्णतः बंद करण्यात येणार आहे. हाच नियम लायन्स पॉईंट, टायगर पॉईंट, भाजे धबधबा येथेही लावण्यात येणार आहे. याशिवाय शनिवार, रविवारसह सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी लोणावळा गावात जाणार्या लक्झरी बस, मिनीबस, टेम्पो ट्रॅव्हलरसह अवजड वाहनांवर पूर्णतः बंदी घालणे आदी निर्णयाची माहिती या वेळी देण्यात आली.
लोणावळ्यात पर्यटकांच्या वाहनांमुळे होणार्या कोंडीच्या पार्श्वभूमीवर वरील निर्णय घेण्यात आला. भुशी धरण, लायन्स पॉईंट, भाजे धबधबा येथे पर्यटकांची मोठी गर्दी होत असते. यामुळे पुणे- मुंबई महामार्गासह भुशी रस्त्यावर, भाजे लेणी रस्त्यावर वाहतूक कोंडी होते. पर्यटकांची वाढती संख्या व अपुर्या सुविधांमुळे वाहतूक नियमन करताना लोणावळा तसेच लोणावळा ग्रामीण पोलिसांची अक्षरशः दमछाक होत आहे.
यावर उपाय म्हणून पोलिस प्रशासनाने शनिवार, रविवारसह सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी भुशी धरण दुपारी तीननंतर पर्यटकांसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला असून लोणावळा गावात जाणार्या रस्त्यावर अवजड वाहनांना बंदी घातली आहे. डी. डी. शिवथरे यांनी हुल्लडबाज पर्यटकांवर आणि महिलांची छेडछाड करणार्यांवर कडक कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.