breaking-newsताज्या घडामोडीपुणे

भावाच्या मृत्यूनंतर पुतणीसाठी वहिनीशी लग्न

सांगली – जुन्या रुढीपरंपरांना फाटा देत सांगलीत आदर्श उदाहरण निर्माण झालंय. सांगलीतील विधवा वहिनीशी दिराने लग्न केलं आहे. सोनाली पाटील असं या नवरी मुलीचं नाव असून उमेश पाटील असं नवरदेवाचं नाव आहे. मोठ्या भावाच्या मृत्यूनंतर पोरकी झालेल्या वहिनी सोनाली आणि लहान पुतणी रियाच्या भविष्याचा विचार करुन उमेश पाटील आणि पाटील कटुंबीयानी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

लग्नगाठी या नशिबाने बांधल्या जातात, असे म्हटले जाते. मात्र ही नाती अपघातांनी हिरावली तर काय करायचे, या प्रश्नाचे उत्तर अनेकांकडे नसते. तरीही परंपरेचे, समाजाच्या मानसिकतेचे बंध तोडत सांगलीतील पाटील कुटुंबीयांनी आपल्या मोठ्या विधवा सूनेचे लग्न आपल्याच लहान मुलाबरोबर म्हणजे सोनालीच्या दिराबरोबर केले.

सांगलीतील शांताराम नामदेव पाटील यांचा मोठा मुलगा संतोष याचे लग्न इचलकरंजी येथील दत्तात्रय निवृत्ती पाटील यांची कन्या सोनाली हिच्याशी झाले होते. लग्न झाल्यानंतर दोन वर्षातच म्हणजे 5 ऑगस्ट 2018 रोजी अल्पशा आजाराने संतोष पाटील यांचे निधन झाले.

निधनासमयी संतोषची मुलगी सहा महिन्यांची होती आणि 21 वर्षीय पत्नी सोनाली ही विधवा झाली. पदरी छोटीशी कन्या आणि मोठ्या आयुष्याची अनिश्चित भविष्याची चिंता घेऊन सोनालीची वाटचाल सुरू झाली. मुलाच्या मृत्यू बरोबरच सूनेच्या भविष्याची आणि तिच्या दुःखाची चिंता सासू राजश्री आणि सासरे शांताराम पाटील यांना वाटू लागली. सोनालीला आयुष्यभर सांभाळ करायचा निर्णय घेतला तरी घरात येणारी धाकटी सून ही सोनाली आणि तिच्या मुलीला प्रेम देईलच असं नाही. या शिवाय पुन्हा भविष्यातील या दोन्ही महिलांचे नातेसंबंध कसे राहतील याचीही चिंता त्यांना होती. आपल्या विधवा सूनेचं बाहेरील तरुणाशी लग्न करायचं म्हटलं तर तो मुलगा व्यवस्थित नांदवेल का असे अनेक प्रश्न पाटील कुटुंबीयांना सतावत होते.

सासू राजश्री आणि सासरे शांताराम पाटील पुरोगामी विचाराचे असल्याने त्यांनी सूनेचे वैधव्य दूर करण्याचा निर्णय घेतला. सूनेच्या माहेरच्या कुटुंबीयांशी बोलून पाटील कुटुंबीयांनी आपल्या विधवा सूनेचा विवाह आपल्या लहान मुलाशी लावण्याचा निर्णय घेतला आणि 24 फेब्रुवारी रोजी सोनाली पाटीलचा विवाह उमेश पाटील यांच्याबरोबर सांगलीत संपन्न झाला.

परंपरेचे बंध तोडताना सासू राजश्री पाटील यांनी समाजाचा विचार करण्यापेक्षा दोन स्त्रीच्या आयुष्याचा विचार महत्वाचा असल्याचे, सून सोनाली आणि नात रिया यांच्या भविष्याचा विचार करुण लग्नाचा निर्णय घेतला आणि लग्नही झाले.  या नात्याला माणुसकीची किनार असल्याने सांगलीतील समाजातील अनेक लोकांनी या निर्णयाचे कौतुक केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button