breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे

भारत नाना भालकेंनी केले भल्या-भल्यांना चारीमुंड्या चित

पंढरपूर –

पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा गुरसाळे (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष भारत तुकाराम भालके (वय 60) यांचे शुक्रवारी पुणे येथील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान रात्री उशिरा निधन झाले. त्यापूर्वी सायंकाळी देशाचे माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी रुबी हॉस्पिटलमध्ये जाऊन तेथील डॉक्‍टरांकडे आमदार भारत भालके यांच्या प्रकृतीविषयी चौकशी केली होती. दरम्यान, भालकेंची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर अपयशी ठरली.

त्यांच्या पश्‍चात पत्नी, मुलगा, विठ्ठल कारखान्याचे संचालक भगिरथ भालके, तीन विवाहित मुली, सून व नातवंडे असा परिवार आहे.

30 ऑक्‍टोबर रोजी आमदार भारत भालकेंना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यानंतर त्यांना पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. यशस्वी उपचारानंतर त्यांनी कोरोनावर मात देखील केली होती. मात्र त्यांना आठ दिवसांपूर्वी पुन्हा त्रास जाणवू लागला होता. उपचारासाठी रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. गुरुवारी (ता. 26) त्यांची प्रकृती अधिकच खालावली होती. रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास वाढल्याने शुक्रवारी दिवसभर त्यांची प्रकृती चिंताजनक होती. दरम्यान, रात्री उशिरा त्यांचे निधन झाले. आमदार भालके यांच्या निधनामुळे पंढरपूर तालुक्‍यावर शोककळा पसरली आहे.

आमदार भारत भालके यांची राजकीय पार्श्वभूमी
2004 साली पहिल्यांदा भारत भालके यांनी शिवसेनेत प्रवेश करून विधानसभेची निवडणूक लढवली. माजी आमदार सुधाकर परिचारक आणि (कै.) राजूबापू पाटील यांच्या विरोधात त्यांनी लढत देत तब्बल 40 हजारांहून अधिक मते घेतली होती. तिरंगी लढतीत परिचारक यांनी बाजी मारली होती.

2009 साली भालके यांनी “रिडालोस’कडून निवडणूक लढवली होती. त्या वेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचा पराभव करत “जायंट किलर’ म्हणून पहिल्यांदाच राज्याला ते परिचित झाले.

2014 साली त्यांनी कॉंग्रेसकडून निवडणूक लढवली होती. भाजप आमदार प्रशांत परिचारक आणि राष्ट्रवादीचे उमेदवार चंद्रकांत बागल यांचा त्यांनी पराभव केला होता.

2019 मध्ये राज्यात भाजप – शिवसेनेची लाट असतानाही त्यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली. या निवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार सुधाकर परिचारक यांचे तगडे आव्हान समोर असताना देखील भालके यांनी सर्वसामान्य जनतेच्या बळावर (कै.) परिचारकांचा सुमारे 14 हजारांहून अधिक मताधिक्‍याने पराभव करत विजयाची हॅट्ट्रिक केली.

काम करण्याची तडफ आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या मदतीला धावून जाण्याची त्यांची पद्धत यामुळे सर्वसामान्य लोकांमध्ये त्यांची क्रेझ होती.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button